कामशेत पोलिसांनी झटकले हात; नातेवाइकांनी फिरविली पाठ
पिंपरी – कामशेत येथून तीन महिन्यांनी बेपत्ता झालेल्या पर्यटकाच्या मृतदेहाची कवटी आणि हाडे कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडली. कपड्यावरून नातेवाईकांना ओळख पटली आणि मृतदेह अर्थात कवटी आणि हाडं नातेवाईकांनी ताब्यातही घेतली. मात्र दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार करणार असल्याने नातेवाईकांनी मृतदेह यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाच्या शवागृहातील शीतगृहात ठेवला. परंतु नातेवाईकांच्या कुटुंबातील काहींनी आक्षेप घेतला. आणि पोलिसांनी हाडांचे नमूने “डीएनए’साठी पाठविले आहेत. मात्र “डीएनए’चा अहवाल आल्यावरच कवटी आणि हाडांवर अंत्यसंस्कार करू, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.
तर दुसरीकडे तीन दिवसांपेक्षा अधिक दिवस मृतदेह शवागृहात ठेवता येत नाही. मात्र गेल्या 77 दिवसांपासून ती कवटी आणि हाडे पडून आहेत. यामुळे ती कवटी आणि हाडे यांचे करायचे काय, असा प्रश्न वायसीएम रुग्णालयाच्या प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.
मावळ तालुक्यातील कामशेत येथे इंद्रायणी नदीवर पिंपरीतील 16 जण वर्षाविहारासाठी गेले होते. त्यातील एक पर्यटक पोहताना अचानक बेपत्ता झाला. शोध घेऊनही त्या मित्राचा पत्ता लागला नाही. यामुळे त्याच्या मित्रांनी कामशेत पोलीस ठाण्यात “तो’ बेपत्ता झाल्याची नोंद केली. त्यानंतर वारंवार शोध घेऊनही बेपत्ता व्यक्तीचा शोध लागला नाही. साधारणः तीन महिन्यांनी म्हणजेच 30 नोव्हेंबर 2019 रोजी कामशेत पोलिसांना नदीपात्रालगत काही हाडे व मानवी कवटी दिसून आली. “त्या’ मयत व्यक्तीच्या अंगावरील कपडे आणि बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे कपड्यांचे वर्णन सारखे असल्याने बेपत्ता व्यक्तीच्या नातेवाईकांना बोलविण्यात आले. कपड्यांच्या वर्णनावरून ओळख पटवून मृतदेह कायदेशीर प्रक्रियेनंतर नातेवाईकांनी ताब्यात घेतला.
मृतदेहावर दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार करायचे असल्याने “तो’ वायसीएम रुग्णालयातील शवागृहात एक दिवसांसाठी ठेवला. मात्र मयत व्यक्तीच्या कुटूंबात वाद निर्माण झाला. यामुळे “तो’ मृतदेह म्हणजेच कवटी आणि हाडे आपल्याच घरातील व्यक्तीचा आहे का, असाही प्रश्न काही सदस्यांनी उपस्थित केला. त्यामुळे गेल्या 77 दिवसांपासून मृतदेह वायसीएम रुग्णालयाच्या शवागृहात पडून आहे. “डीएनए’चा रिपोर्ट आल्यावरच आम्ही अंत्यसंस्कार करू, अशी कठोर भूमिका नातेवाईकांनी घेतली.
आम्हाला “डीएनए’ हवाय..
मृत झालेली व्यक्ती आमचीच आहे का, याबाबत त्यांच्या कुटुंबियांमध्ये वाद निर्माण झाले आहेत. “डीएनए’चा अहवाल आल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका काही नातवाईकांनी घेतली आहे. यामुळे पोलिसांनी “डीएनए’चा अहवाल लवकर आणावा, असे मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी स्पष्ट केले आहे.
आम्ही मयत व्यक्तीच्या कपड्यावरून त्याची ओळख पटविली आहे. मयत व्यक्तीच्या हाडांचे नमूने “डीएनए’साठी पाठविले आहेत. नातेवाईकांनीही मृतदेह ताब्यात घेतला आहे. यामुळे त्याच्यावर अंत्यसंस्कार कधी करायचे हा त्यांचा प्रश्न आहे.
– मृगदीप गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक, कामशेत पोलीस ठाणे.
भविष्यात काळात वायसीएम रुग्णालयाकडून पोलीस आणि नातेवाईकांना तीन लेखीपत्र देईल. त्यानंतरही मृतदेह ताब्यात घेतला नाही, तर मग वायसीएम रुग्णालयाकडून अंत्यसंस्कार केले जातील.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता-वायसीएम रुग्णालय.