आरे वृक्षतोडीवरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा सरकारवर निशाणा
मुंबई : सध्या वादाचा आणि चर्चेचा मुद्दा ठरलेला आरे वृक्षतोडीवरून राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता या मुद्यावरून युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रशासन आणि सरकारवर निशाणा साधला आहे. वृक्षतोडीच्या मुद्यावर बोलताना सत्तेत आल्यानंतर आरे परिसराला जंगलाचा दर्जा दिला जाईल, असे आश्वासन पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे का दाखल करण्यात आले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेत्त आल्यावर वृक्षतोड करणाऱ्यांना बघून घेऊ असा इशारा दिला होता.
Detaining citizens and arresting youth for standing with environment. So much for speaking about environment at global level while we destroy ecosystems here in the middle of the night. https://t.co/BI10eHsUIz
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 5, 2019
महायुतीच्या घोषणेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत व्यासपीठावर बसलेल्या आदित्य ठाकरेंनी फडणवीस सरकारवरच टीका केली आहे. शांततेने आंदोलन करणाऱ्यांना तुरुंगात डांबणाऱ्यांना लाज वाटायला हवी, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. आरेतील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरुन प्रशासन आणि पर्यावरण प्रेमी आमने-सामने आले आहेत. 38 लोकांना अटक करण्यात आली होत तर 55 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. आरे कॉलनीतील वृक्ष तोडीप्रकरणी तात्काळ हस्तक्षेप करावा यासाठी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. 2 हजार 656 वृक्षांना वाचवण्यासाठी आंदोलन करत असलेल्या कार्यकर्ते, सामाजिक संघटनांना सलग दुसऱ्या दिवशी झटका बसला. मुंबई मेट्रो कॉर्पोरेशननेही (एमएमआरसी) नवीन नोटीस जारी करण्याच्या कार्यकर्त्यांचा दावा फेटाळला आहे.