- दोन वर्षात 208 मुला-मुलींवर अत्याचाराच्या गुन्ह्यांची नोंद
– संदीप घिसे
पिंपरी – लहान मुलीवरील अत्याचार कमी व्हावेत, यासाठी पोक्सो हा नवीन कायदा 2012 साली शासनाने अंमलात आणला. तरीदेखील लहान मुलांवरील अत्याचारात कमी झालेली नाही. गेल्या दोन वर्षात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालच्या हद्दीत तब्बल 208 लहान मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची नोंद आहे. यापैकी 90 टक्के घटनांमध्ये अत्याचार करणारे जवळचे नातेवाइक किंवा परिचित होते. त्यामुळे अल्पवयीन मुली घरात आणि घराबाहेरही असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे.
महिनाभरापूर्वी दापोडी येथे 15 वर्षीय मुलीवर तिच्याच सावत्र वडिलांनी लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला. या घटनेतील आरोपीला अद्यापही अटक झालेली नाही. नेहरूनगर आणि काळेवाडीतही लैंगिक अत्याचाराच्या अशाच घटना घडल्या होत्या. तर पिंपरीमध्ये मामाने त्याच्या पाच आणि सहा वर्षीय भाच्यांवर लैंगिक अत्याचार केले होते. शाळेत शिकविण्यात येणाऱ्या “गुड टच आणि बॅड टच’ मधून या घटना उघडकीस आल्या.
पिंपळे सौदागर येथे जुलै 2019 मध्ये चुलत्यानेच आपल्या अडीच वर्षीच्या पुतणीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला होता. याच महिन्यात भोसरीमध्ये तीन मुलासह आईने आत्महत्या केल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली होती. त्यातील दोन मुलींवर पित्यानेच अनैसर्गिकही लैंगिक अत्याचार केल्याचे शवविच्छेदहन अहवालातून समोर आले. अशा प्रकारच्या अनेक घटनांची नोद पोलीस ठाण्यांमध्ये आहे. मुलींवर अत्याचार करणारे घरातील जवळची व्यक्ती असल्याचे या घटनांमधून उघड झाले आहे. मात्र अशा अनेक घटना आहेत की ज्यामध्ये अत्याचार करणारी घरातील व्यक्ती असल्याने बदनामीच्या भितीने गुन्हे दाखल केले जात नाहीत.
नातेसंबंधातील पवित्र नात्याला कलंकित करणाऱ्या अपप्रवृत्तीना आळा घालण्याचे आव्हान समाजव्यवस्थेसमोर आहे. त्याप्रमाणे प्रसंगानुरूप एकट्याने राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर नातेवाईक, शेजारील अनोखीची व्यक्ती यांच्याकडून आणि रोडरोमिओंकडून होणाऱ्या शोषणाच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्यामुळे मुलींची सुरक्षितता अधिक धोक्यात आली आहे.
गेल्याच आठवड्यातील पिंपरीतील एका 12 वर्षीय मुलीला तुझ्या वडिलांचा मी मित्र आहे, असे सांगून तिला देहूरोडला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा नराधम रिक्षा चालकांच्या सतर्कतेमुळे गजाआड झाला. पण सात वर्षापूर्वी ओटास्कीम, निगडी येथून एका चार वर्षीय बालिकेचे घरासमोरून अपहरण करून जकात नाक्याच्या मागे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
तसेच तिचा खूनही केला. अशाच प्रकारची घटना कासारवाडी रेल्वे स्टेशनजवळ घडली. पत्राशेड, पिंपरी येथील बालिकेचे शेजाऱ्याने अपहरण करून तिच्यावर अत्याचार केले. तसेच तिचा खून करून मृतदेह एचए ग्राऊंडमध्ये टाकला. वरिल तीनही घटनांमधील आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. तर दोन दिवसांपूर्वी शहरातील एका लहान मुलीचा अनोळखी व्यक्तीने विनयभंग केला.
पुरूषप्रधान संस्कृतीत महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी शिक्षण देण्याची व तिला आर्थिकदृष्ट्या पायावर उभे करण्याच्या विविध उपाययोजना होत आहेत. परंतु त्या अगोदरच बालवयातच मुलींना घरात, शाळेत, रस्त्यावर कुठेही भयमुक्त वातावरण राहिले नसल्याने त्या अत्याचाराचा सामना करीत आहेत. हे सर्व थांबविण्यासाठी सामाजिक सुरक्षेचा पाया भक्कम करण्याची जबाबदारी समाज व्यवस्थेने घेणे गरजेचे आहे.
…तरच कायद्याचा वचक बसेल
दांडिया खेळण्यासाठी गेलेल्या 14 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या आकाश बाबासाहेब गायकवाड (वय 19, रा. थेरगाव) याला दोनच दिवसांपूर्वी न्यायालयाने तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयात आरोपींना शिक्षेचे प्रमाण वाढल्यास आरोपींवर वचक बसेल.