कोल्हापूर – आग व महापुरात नुकसान होणाऱ्या पिकांचाही पीक विम्यामध्ये समावेश करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांना कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली.
कोल्हापूर दौऱ्यावर आले असता यासंदर्भातील निवेदन भुसे यांन देण्यात आले. यावेळी राजू शेट्टी म्हणाले, गत दोन वर्षामध्ये सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच दरवर्षी अस्मानी संकटामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.
दरवर्षी दोन्ही जिल्ह्यातील हजारो एकर शेती पाण्याखाली जाऊ लागलेली आहे. यामुळे ऊस व भाजीपाला उत्पादकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. या महापुरामुळे शासनाकडून जी नुकसान भरपाई दिली जात आहे, ती अत्यंत अपुरी असून त्या मदतीतून शेतकरी मशागतदेखील करू शकत नाही. यामुळे सदरच्या नुकसान भरपाईतून सावरण्यासाठी शेतकरी पीक विमा उतरविण्यास तयार आहेत.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी 1 लाख व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रूपये नुकसान भरपाई देऊन सदर विम्याचा हप्ता शेतकरी, पाटबंधारे विभाग व साखर कारखाने यांच्याकडून घेऊन राज्य सरकारच्या विमा कंपनीमार्फत पूरग्रस्त भागातील ऊस व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
तसेच आगीमध्ये जळालेल्या उसासही शेतकरी व महावितरण यांचेकडून पीक विमा हप्ता भरून घेऊन नुकसान भरपाई देणे शक्य आहे. मी या आधीही आपणांस व मुख्यमंत्री महोदयांना पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पीक विम्याबाबत अवगत केले असून याबाबत शासन स्तरावरून लवकरात लवकर कार्यवाही करून पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.