नगर – आज लागेल उद्या लागेल, असे म्हणत ज्याची प्रतीक्षा शिक्षकांकडून सुरु होती. ती आता संपलेली आहे. बदली संदर्भात दाखल केलेल्या 183 शिक्षकांच्या हरकतींवर जिल्हा परिषद प्रशासनाकडून निकाल देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता शिक्षकांना पुढील वाटचाल करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.
जून महिन्यात झालेल्या शिक्षकांच्या बदलीप्रकियेमध्ये त्रुटी आहेत. काहींना ऑनलाइनवर भरलेल्या शाळांपैकी एकही शाळा मिळाली नाही.दुसरीकडे, एका शाळेवर दोघांच्या बदल्या झाल्या. या बदलीप्रक्रियेवर अनेकांनी हरकती नोंदविल्या. बदलीनंतर सात दिवसांत हरकती घेऊन त्यावर एका महिन्यात सुनावणी घ्यावी, असा आदेश सरकारने बजावला होता.
मात्र, तीन महिन्यांनंतर सुनावणी झाली. उशिरा सुनावणी झाल्याने निकाल लवकर जाहीर होईल, अशी अपेक्षा शिक्षकांची होती. मात्र ती फोल ठरली. शिक्षकांनी दाखल केलेल्या हरकतींवर सुनावणी होऊनही निकाल लागत नव्हता. निकाल जाहीर झाल्यामुळे शिक्षकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.