तांत्रिक नाही तर नैतिकदृष्ट्याही ते सदस्य राष्ट्रवादीत; राष्ट्रवादीच्या 19 सदस्यांची आज बैठक
नगर – येत्या मंगळवारी होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. बहुमताचा आकडा जुळविण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता लक्षात घेवून कॉंग्रेस अंतर्गत थोरात गटाच्या 13 सदस्यांचा मुक्काम आता मुंबईत हलविण्यात आला आहे.
तांत्रिक नाही तर नैतिक दृष्ट्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ते पाच सदस्य पुन्हा पक्षाबरोबर राहणार असल्याचे स्पष्ट झाले असून राष्ट्रवादीच्या 19 सदस्यांची एकत्रित बैठक उद्या पक्षाच्या कार्यालयात होणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून विद्यमान उपाध्यक्ष राजश्री घुले तर उपाध्यक्षपदासाठी कॉंग्रेसकडून विद्यमान सभापती अनुराधा नागवडे यांची नावे निश्चित झाल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी येत्या 31 डिसेंबरला निवडणूक होत आहे. राज्यात नव्याने झालेल्या सत्ता समिकरणाप्रमाणेच नगरमध्ये देखील महाविकास आघाडीची पूर्ण तयारी झाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस या महाविकास आघाडीने सत्तेचा सोपान चढविण्यासाठी आवश्यकपेक्षाही जास्त संख्याबळ जुळविले आहे.
त्यामुळे भाजपच्या पातळीवर विशेषतः विखेंच्या गोठातील हालचाली थंडावल्याचे दिसत आहे. गेल्या चार दिवसांपासून खासदार डॉ. सुजय विखे बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. परंतू महाविकास आघाडीने केलेल्या दावामुळे खा. विखेंना कितपत यश येणार हे आता 31 डिसेंबरला निवडीच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. महाविकास आघाडीचा अध्यक्ष होण्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या नेत्यांबरोबर त्यांचे समर्थक असलेले जिल्हा परिषद सदस्य देखील भाजपमध्ये गेले होते. तांत्रिक दुष्ट्या हे सदस्य राष्ट्रवादीत असले तरी नैतिकदृष्ट्या ते भाजपमध्ये असल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ कमी झाले होते. पण आता हे पाचही सदस्य राष्ट्रवादीबरोबर असल्याचे सांगण्यात आले. पक्षाचे संख्याबळ 19 झाली आहे. या सर्व सदस्यांची उद्या पक्ष निरीक्षक अंकुशराव काकडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवनमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत अध्यक्षपदासाठी विद्यमान उपाध्यक्ष राजश्री घुले यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, फोडाफोडीचे राजकारणाची शक्यता लक्षात घेवून महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या गटाच्या 13 ही सदस्यांना मुंबईत हलविले आहे. पुढे चार दिवस या सदस्यांचा मुक्काम मुंबईत राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात संगमनेरमध्ये 9, श्रीरामपूरमधील 2, नगर तालुक्यातील 1 व श्रीगोंद्यातील 1 असे 13 सदस्यांचा समावेश आहे. आज सकाळी हे सर्व सदस्य मुंबईत पोहचले आहेत. उपाध्यक्षपद कॉंग्रेसकडे आहे. त्यानुसार या पदासाठी महिला व बालकल्याणच्या सभापती अनुराधा नागवडे यांचे नाव निश्चित होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
शिवसेना, क्रांतिकारीला प्रत्येकी एक समिती
महाविकास आघाडीत जिल्हा परिषदेतील विविध विषय समितीच्या सभापतीचे वाटप देखील झाले आहे. त्यात अध्यक्षपदासह एक समिती राष्ट्रवादीकडे, कॉंग्रेसकडे उपाध्यक्षपद व एक समिती तर शिवसेना व शेतकरी क्रांतीकारी पक्ष यांना प्रत्येकी एक समिती देण्याचे ठरले आहे.