बॅंकॉक – भारतीय बॅडमिंटनपटूंनी येथे सुरु असलेल्या थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेत जर्मनीपाठोपाठ कॅनडाचाही 5-0 असा धुव्वा उडवला. या विजयाच्या जोरावर भारतीय संघाने या स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
सोमवारी झालेल्या लढतींमध्ये किदाम्बी श्रीकांतने ब्रायन यंगवर 20-22, 21-11, 21-15 अशी मात केली. दुहेरीत सात्विक साईराज रांकिरेड्डी व चिराग शेट्टी जोडीने जेसन अँथनी व केविन ली जोडीचा 21-15, 21-12 असा पराभव केला. त्यानंतर एच. एस. प्रणोयने आपलाच सहकारी बी. आर. संकिर्थवर 21-15, 21-12 अशी मात केली.
कृष्णप्रकाश गर्ग व विष्णुवर्धन गौड जोडीने डोंग ऍडम व नेल याकुरा जोडीवर 21-15, 21-11 असा विजय मिळवला. दिवसातील अखेरच्या सामन्यात प्रियांशू राजावतने व्हिक्टर लॅलचा 21-13, 20-22, 21-14 असा पराभव केला. आता बाद फेरीत भारताचा सामना तैपेयीविरुद्ध होणार आहे.
महिलांच्या उबर करंडक स्पर्धेत भारतीय संघाने विजयी सलामी देताना कॅनडावर 4-1 अशी मात केली. या स्पर्धांच्या इतिहासात भारताने आजवर एकदाही उपांत्य फेरी गाठलेली नसून यंदा ही कामगिरी करण्याची संधी आहे.