वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येणारा महत्त्वाचा दिवस म्हणजे 5 जानेवारी होय…! आपल्या लाडक्या दैनिक “प्रभात’चा हा वर्धापन दिवस…! हा दिवस आम्ही आमच्या असंख्य वाचकांच्या आणि हितचिंतकांच्या साक्षीने अगदी दिवाळी आणि पाडव्याच्या उत्साहाप्रमाणे साजरा करतो. या दिवशी कोणतीही औपचारिकता न ठेवता आपणा सर्व स्नेहीजनांचा एक कौटुंबिक सोहळा गोगटे प्रशालेच्या पटांगणावर रंगतो. हजारोंच्या संख्येने आपण येता. “प्रभात’वर कौतुकाचा वर्षाव करता. आपुलकीच्या, ममत्वाच्या, वडीलकीच्या नात्याने काही सूचना करता आणि भरभरून शुभेच्छाही देता.
गेली अनेक दशके ही परंपरा आपण जोपासली. मात्र, काही वेळेस परिस्थितीला शरण जाण्याशिवाय पर्याय नसतो. यंदा करोनाचे महासंकट घोंगावते आहे. त्याचा भर कमी झाला असला तरी धोका कायम आहे. तो पूर्णपणे गेलेला नाही. मात्र, त्याच्या परतीचा प्रवास सुरू झाल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
करोनाच्या संकटकाळात प्रशासकीय यंत्रणेसोबत जसे वैद्यकीय कर्मचारी, पोलीस प्रत्यक्ष रणांगणावर उभे होते, तसेच वाचकांना ताजे अपडेट्स देण्यासाठी “प्रभात’ही उभा होता. मध्यंतरी काही काळ वितरण साखळी विस्कळीत झाली खरी, मात्र आम्ही आपल्यापर्यंत “पीडीएफ’च्या माध्यमातून पोहोचतच राहिलो. आपण आवर्जून विचारलेल्या प्रश्नांचे निरसन करणारे लेख आणि बातम्याही प्रकाशित केल्या.
आता पुन्हा आम्ही आपल्यापर्यंत येत आहोतच आणि आपणही अगदी दिलखुलास आणि उत्स्फूर्तपणे आमचे स्वागत केले आहे. मात्र, तरीही आणखी काही काळ आपल्याला खबरदारी घ्यावी लागणार आहे. गर्दी टाळावी लागणार आहे. त्यामुळेच दरवर्षी होणारा आपला आपुलकीचा कौटुंबिक सोहळा यंदा होणार नाही. अनेक चाहत्यांनी दूरध्वनीवरून व्यक्तिश: मला, सरव्यवस्थापकांना, संपादकांना आणि प्रभात परिवारातील प्रत्येकालाच दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो आणि आपल्या ऋणातच राहणे आम्ही पसंत करू. कारण तुमचे प्रेम हाच आमचा मोलाचा ठेवा आहे. करोनाचे मळभ हटल्यानंतर आपण भेटणारच आहोत, नव्या आनंदाने, नव्या उमेदीने आणि त्याच आपुलकीने…!
आपला स्नेहांकित
आनंद गांधी, व्यवस्थापकीय संचालक, प्रभात