पुणे -आगामी कालावधीत करोनाची तिसरी लाट येण्याची भीती आहे. त्यामुळे शाळा सुरू होणे जवळपास अशक्य मानले जात आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षातही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा ऑनलाइनद्वारेच होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
मागील वर्षभरापासून राज्यात करोनाने बस्तान बसवले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून शाळाही बंदच होत्या. ऑनलाइन शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत आहे.
मात्र, या माध्यमाचे शिक्षण विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना ही कंटाळवाणे वाटू लागले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे. मात्र, तरीही पुन्हा ऑनलाइन शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (विद्या प्राधिकरण) वतीने ऑनलाइन शिक्षणासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यू-ट्युब, दूरदर्शन, दीक्षा ऍप, स्वाध्याय यांसह विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांसाठी शिक्षण उपलब्ध करून देण्यात आले होते.
“शाळा बंद पण शिक्षण सुरू’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यात आले होते. यातून बहुसंख्य विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ झाला. यंदाही मागील वर्षापेक्षा अधिक प्रभावीपणे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण उपलब्ध करुन देण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.
करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत शाळकरी मुलांना जास्त बाधा पोहोचण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे शाळकरी मुलांची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. 2021- 22 मधील शैक्षणिक वर्ष 14 जूनपासून सुरू होणार आहे. मात्र, या शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याची शक्यता मावळली आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जाऊ नयेत, म्हणून विद्या प्राधिकरणाच्या वतीने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
दूरदर्शनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रभावी शिक्षण मिळत आहे. याद्वारे अधिकाधिक विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे व दूरदर्शनवरील जास्त स्लॉट शिक्षणासाठी मिळावेत, यासाठी प्रस्ताव तयार करून तो पाठवला आहे. त्याच्या मान्यतेनंतर पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
– दिनकर टेमकर, संचालक, विद्या प्राधिकरण