नवी दिल्ली : देशात परतीच्या पावसाचा प्रवास सुरु झाला आहे. दरम्यान, या वर्षी काही राज्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फुल शेतीवर देखील या अतिवृष्टीचा मोठा परिणाम झाला आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालच्या फुल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सध्या बाजारात फुलांची आवक कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे दिवाळीत फुलांच्या किंमतीत दुपटीने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक राज्यांमध्ये पिकांचे तसेच बागायती शेतीचे नुकसान झाले आहे. पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. वातावरणातील बदल आणि अतिवृष्टीचा फुल शेतीवर परिणाम झाले आहे. फुलांच्या उत्पादनात घट आली आहे. महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर फुल शेती केली जाते. परंतू यंदा पावसामुळे फुलांचे पीक जवळपास नष्ट झाले असून मंडईत फुलांची आवकही बरीच कमी झाली आहे. तर दुसरीकडे कपश्चिम बंगालमध्येही फुलांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, यावेळी सणासुदीच्या काळात फुलांची पिकं वाया गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. एप्रिलमध्ये लागवड केलेले पीक ऑक्टोबरपर्यंत खराब झाले आहे. या महिन्यात फुलांच्या काढणीला सुरुवात होत असते. कारण या दोन महिन्यात मोठे सण असतात. याचा फायदा फुल उत्पादक शेतकऱ्यांना होत असतो. मात्र, आता फुल उत्पादकांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे.