पोळ्यावर दुष्काळाचे सावट : बाजारपेठेतही निरुत्साह
जामखेड – शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला बैलपोळा हा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र दुष्काळ परिस्थितीमुळे जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे. परिसरात अद्याप एकही मोठा पाऊस न झाल्याने शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहे. सध्या परिसरात बैल धुण्यासाठीही पाणी नसल्यामुळे परिस्थिती विदारक बनली आहे. शहरातील बाजार पेठेतही शुकशुकाट दिसून येत आहे.
पोळा सणासाठी लागणाऱ्या बैलांच्या साज विक्रीसाठी जामखेड येथे दरवर्षी मोठा आठवडे बाजार भरतो. यावर्षीही व्यापाऱ्यांनी विविध साज साहित्य दुकानात विक्रीसाठी ठेवले आहे. यामध्ये मोरखी, सुती दोरी, घंटी, बाशिंग, झुला, कवड्यांची माळ, हिंगूळ आदी महत्त्वाचे साहित्य असून, नारळ विक्रीसाठी आणलेले आहेत. दरम्यान, पोळ्याच्या दिवशी शेतकरी आपले बैल नदी, विहीर व छोट्या-मोठ्या तलावांवर धुण्यासाठी घेऊन जातात.
परंतु यावर्षी तलाव, विहीर, नदी, नाले कोरडेकाठ असल्याने बैल धुवायचे कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दोन वर्षांपासून दुष्काळी स्थितीमुळे या सणावरही विरजन पडले आहे. अशी परिस्थिती असल्याने सणाचा उत्साह निघून गेला आहे. सध्या शेतकऱ्यांच्या नजरा केवळ आकाशाकडे लागल्या असून, पोळ्याच्या अगोदर किंवा पोळ्याच्या दिवशी पाऊस येईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
शेतकरी झाला हताश
पोळा केवळ नावालाच उरल्याप्रमाणे परिस्थिती आहे. वास्तविक पाहता शेतकऱ्यांची पोळा साजरा करण्याची इच्छा आहे. मात्र, पिण्यासाठीच पाणी नसताना बैल धुण्यासाठी पाणी कोठून आणावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अशा विदारक अवस्थेमुळे शेतकरी हताश झाला असल्याचे दिसून येत आहे.