पुणे – खडकवासला धरणसाखळीत आजअखेर गतवर्षीच्या तुलनेत 10 टक्के ( 3 टीएमसी) पाणी कमी आहे. त्यातच यंदा मार्च ते मेमध्ये उन्हाळा कडक राहण्याची चिन्हे आहेत. मनपा हद्दीत 23 गावांचाही समावेश झाल्याने पाण्याची मागणी वाढणार आहे. त्यामुळे ऐन महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूकांच्या तोंडावर यंदा ऐन उन्हाळयात पाणीवाद पेटण्याची शक्यता आहे.
खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांमध्ये सुमारे 18 टीएमसी पाणी असून जुलैअखेर पर्यंत महापालिकेस त्यातील, 8 ते 9 टीएमसी पाण्याची गरज भासणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे यंदा नोव्हेंबर पर्यंत 100 टक्के भरलेली होती. तर, पावसाळ्यात सुमारे साडेसहा टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले.
तर, धरणातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीतही तूर्तास शहराचे पाणी कमी केले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात या धरणांतील पाणी शहरात पिण्यासाठी आणि जिल्ह्यातील सिंचनासाठी जात आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच हा साठा 18 टीएमसीवर आहे. तर गेल्या काही वर्षांत शहर परिसरात मान्सून उशीराने दाखल होत असल्याने जलसंपदा विभाग शहराच्या पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत 15 जुलैपर्यंत पाणीसाठा राखीव ठेवत आहे.
23 गावे आल्याने पाण्याची मागणी वाढणार
या वर्षापासून भामा-आसखेड धरणातून पाणी मिळण्यास सुरूवात झाली असली, तरी प्रत्यक्षात शहराच्या हद्दीत नवीन 23 गावे आल्याने महापालिकेची पाण्याची गरज वाढली आहे. या गावांची 2011 ची जनगणना अवघी साडेपाच लाख आहे. मात्र, प्रत्यक्षात ही लोकसंख्या दुप्पट असल्याची शक्यता आहे. तर, आता पालिकेस नवीन हद्दीपासून पुढील पाच किलोमीटच्या गावांनाही पाणी देणे शासनाच्या आदेशानुसार बंधनकारक आहे. त्यामुळे शासनाकडे 18 टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. प्रत्यक्षात खडकवासला धरणातून गावे येण्यापूर्वी पालिका 14 ते 15 टीएमसी पाणी लागत होते. आता ही गावे आल्यानंतर ही मागणी आणखी वाढणार आहे. प्रत्यक्षात शासनाकडून पालिकेस केवळ 11.50 टीएमसीच पाणी मंजूर असून, महापालिका जादा पाण्याचा कोट्यवधीचा दंड जलसंपदा विभागास मोजत आहे.