सोलापूर – विठ्ठलाचे दर्शन घेतले किंवा विठुरायाच्या भूमीत पाय ठेवला तरी ‘भाग गेला, शीण गेला। अवघा झाला आनंद’ अशी अवस्था दूरदूरहून पायी आलेल्या वारकऱ्यांची झाल्याशिवाय राहत नाही. आज माउलींच्या पालखीने साताऱ्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. माऊलीच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. या तयारीचा आढावा सोलापूरचे पालकमंत्री विजयराव देशमुख यांच्याकडून प्रभातच्या प्रतिनिधींनी घेतला आहे.
वारकऱ्यांच्या सुरक्षा आणि आरोग्याची जबाबदारी आमची असल्याने आरोग्य, पाणीपुरवठा, सुरक्षा, वाहतूक व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असल्याने यंदा चांगला पाऊस पडावा तसेच सर्व वारकऱ्यांची यात्रा सुखाने व्हावी व देशातील सर्व नागरिकांना सुख-समाधान लाभावे हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे, असे विजयराव देशमुख यांनी म्हंटले आहे.