परतीचा पाऊस मात्र चांगला होण्याची शक्यता कमी कालावधीत अधिक पाऊस होण्याची चिन्हे
ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ : डॉ. रामचंद्र साबळे यांचा अंदाज
वाऱ्याचा वेग कमी
वाऱ्याचा वेग कमी आढळल्याने जून, जुलै, ऑगस्टमध्ये राहुरी, कोल्हापूर, धुळे, जळगाव, परभणी येथे पावसात मोठे खंड पडतील. तर सोलापूर, पुणे, निफाड, अकोला, सिंदेवाही, दापोली, पाडेगाव व नागपूर भागात खंडीत वृष्टी राहिल. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये चांगला परतीचा पाऊस होणे शक्य आहे. मान्सून आगमनास उशीर होणार असल्याने जूनमध्ये पावसात मोठा खंड पडण्याची शक्यता आहे.
पुणे – “नैऋत्य मोसमी (मान्सून) पावसाचे वेध लागले असून, यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरीच्या 95 टक्के पाऊस पडेल,’ असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तविला आहे.
वाऱ्याचा वेग कमी आढळल्याने जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसात मोठे खंड पडतील. तर परतीचा पाऊस चांगला होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुणे शहरात सरासरी 566 मिमी पाऊस पडतो, यावर्षी 494 मिमी पाऊस पडेल, असा अंदाज डॉ. साबळे यांनी वर्तविला आहे. डॉ. साबळे यांच्या स्थानिक ठिकाणच्या पाऊस अंदाजाच्या मॉडेलनुसार, संबंधित ठिकाणचे गेल्या तीस वर्षांचे हवामान आणि कृषी विद्यापीठांच्या हवामान केंद्रांनी नोंदवलेली यंदाची हवामान घटक स्थिती विचारात घेण्यात आली आहे. सन 2019 मधील कमाल व किमान तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी आदी घटकांच्या नोंदीवर आधारीत हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यंदा पावसाच्या वितरणातील फरकाबरोबरच पावसात पडणारे खंड आणि कमी कालावधीमध्ये अधिक पाऊस ही या हंगामातील मुख्य वैशिष्ट्ये ठरण्याची शक्यता आहे.