पुणे – आषाढी वारी आरोग्यदायी, निर्मल आणि स्वच्छ करण्यासाठी मोबाइल अर्थात फिरती शौचालये उभारण्यात येणार आहेत. दोन्हीही पालखी सोहळ्यामधील वारकऱ्यांसाठी 1 हजार 600 मोबाइल शौचालये उभारण्यात येणार असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाकडून देण्यात आली.
संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यादरम्यान प्रशासनाकडून विविध सुविधा पुरवल्या जातात. यावर्षी मोबाइल शौचालयांची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी सातारा जिल्हा परिषदेकडे देण्यात आली आहे. त्यानुसार दि. 10 रोजी निविदा खुल्या करण्यात येणार आहेत.
पालखीच्या मुक्कामी आणि विसावाच्या ठिकाणी मोबाइल शौचालय उभारले जाणार आहेत. यामध्ये माउंलींच्या सोहळ्यासाठी 900 आणि तुकोबांच्या सोहळ्यासाठी 700 तात्पुरते शौचालये देण्यात येणार आहेत. यावर्षी दोन्ही मार्गावर 200 ने शौचालयाची संख्या वाढविण्यात आली आहे. पुणे ते पंढरपूरपर्यंत संबंधित जिल्हा प्रशासनाकडून सर्व सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालखीमार्गावर ठिकठिकाणी विसावा आणि मुक्काम स्थळी मोबाइल शौचालय, पाणीपुरवठा, वीज यासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.