भटकंती करायची म्हणून मी काही वर्षांपूर्वी डोंगरदऱ्यात गेलो होतो. अवतीभवतीची हिरवाई पाहत मनसोक्त हिंडलो होतो. पडलेल्या वाटांवर माझे आणखी एक पाऊल उमटवले होते. होत्या त्या वाटा अधिक ठळक केल्या होत्या. जिथे वाट नव्हती तिथे पाऊलखुणा सोडून आलो होतो. माझ्या पावलावर आणखी कुणी पाऊल ठेवलं तर नवी पाऊलवाट तयार होण्याची बेगमी करून ठेवली होती. मी डोळ्यांचे लोलक केले होते. निसर्गाच्या अंगावरून फिरवले होते. मनाची दारं सताड उघडी ठेवली होती. जे दिसेल ते पाहत होतो. डोळ्यात सामावून घेत होतो. त्यावेळी एक दोरी होऊन पडलेला साप क्षणात झेपावला होता. त्याने त्याच्या पुढ्यातला बेडूक मटकावला होता. एक जीव गतप्राण होत असताना दुसऱ्या जीवाचा जठराग्नी शांत होत होता. एक जीव शेवटचे आचके देत असताना दुसरा जीव भूक शांत झाली म्हणून समाधान पावत होता.
झुळझुळणारा ओढा धारेत मासे धरून वाहत होता. जलपूजन करण्यासाठी डोळे मिटावेत, त्याप्रमाणे एक बगळा प्रवाहात डोळे मिटून उभा होता. माशांना वाटायचं कसलीशी काडी उगवली असावी इथे आणि निघाली असावी आभाळाच्या दिशेने. पण बगळ्याला मात्र पाण्याच्या आणि मासोळीच्या स्पर्शातला फरक कळत होता. पायाला स्पर्श करून मासोळी पुढे आली की पाण्यात चोच खुपसून बगळा मासा गट्टम करत होता. मासोळी बगळ्याच्या चोचीतून सुटण्यासाठी धडपड करत होती आणि बगळा तिला स्वतःच्या पोटात ढकलू पाहत होता. बगळ्याच्या चोचीतला काळ पाहणे असह्य झाले म्हणून माशाने डोळे मिटले. त्याचवेळी आपण किती शिताफीने शिकार साधली म्हणून बगळ्याने डोळे उघडले. पंख फडकावले आणि किनाऱ्यावरच्या झाडाच्या दिशेने निघाला. पंख मिटून, पाय पोटाशी घेऊन स्वस्थ पडून राहिला.
नुकत्याच सुरू झालेल्या पावसाळ्यामुळे वाळलेल्या गवताला नव्याने अंकुर फुटले होते. अंकुरलेल्या कोंबांनी आकाशाच्या दिशेने धाव घेतली होती. गवताने पाऊस थांबल्यावर पावसाचे चार थेंब गाठ मारून पात्याच्या किनाऱ्यावर ठेवून दिले. गवताने त्या थेंबांचा लोलक केला. त्यातून सूर्यकिरण पाहून घेतले. थेंबाच्या उदरातल्या सप्तरंगाचं दर्शन घेतलं. समाधानाने आणखी एक अंकुर जन्माला घातला. पण “हाय रे दैवा! हे काटेरी काय टोचतं आहे अंगाला.’ गवताला वाटलं थेंबाच्या दुर्बिणीतून पाहावं कोण आपल्यावर चाल करून आलं आहे ते. पण कसलं काय? ती थेंबांची दुर्बीण कधीच फुटली होती. मातीत मिसळली होती. मग गवताच्या पात्याने मनःचक्षूंच्या डोळ्यांनी पाहिलं तर एक हरीण त्याला कुरतडत होती. गवताला आंदण मिळालेली जागा सोडताही येत नव्हती. हरिणीवर विषारी फवारा सोडता येत नव्हता. दंश करता येत नव्हता. कडाडून चावा घेता येत नव्हता. शेवटी हरिणीच्या मुखातला घास होण्याखेरीज गवताच्या हाती काहीही उरलं नाही.
शेजारचं गवताचं बेट, आपल्या भाऊबंधांवर काळाने घेतलेली झेप पाहत होतं. आपलीही शंभरी भरली म्हणून थरथरत होतं. आता हे हरीण आपलाही घास घेणार या कल्पनेने त्याची पाने पिवळी पडू लागली होती. पण तेवढ्यात चमत्कार झाला. दबक्या पावलाने एक वाघ हरिणीच्या दिशेने सरसावला. हरिणीला वाघाची चाहूल लागली म्हणून तिने मुखाशी असलेला घास तसाच टाकून धूम ठोकली. वाघानेही मंद चाल टाकून दिली. वाऱ्याच्या वेगाने झेप घेतली. हरिणीवर झडप घातली. सरळ नरडच पकडलं जबड्यात. ते दृश्य पाहून गवताच्या पात्याचा थरकाप उडाला. त्याने पात्याने डोळे मिटून घेतले. पण गवताच्या पात्याला कान काही बंद करता आले नाही. वाघाची गुरगुर आणि हरणाचं हातपाय झाडणं गवताच्या कानावर आदळत राहिलं.
काळाचा लोलक अवतीभवती पाहत हिंदोळे घेत होता. एखादा चित्रपट डोळ्यासमोरून सरकवा तशा या आठवणी मनपटलावरून पुढे सरकत होत्या. काळही त्याच्या गतीने पुढे सरकत होता. अवतीभोवती घडणारं घटित पाहत होता. पण त्यावर मार्ग काढणं हे काळाचं काम नव्हतं. काळाचं काम एकच पुढे सरकत रहायचं. असाच काळ पुढे सरकत राहिला. मध्ये बरीच वर्षं गेली. मी पुन्हा त्याच डोंगरदऱ्यात भटकंतीला जायचं ठरवलं. त्याच वाटांवरून चालत गेलो. मधल्या काळात त्या वाटांवर पावलांचे आणखी कितीतरी ढीग साचले होते. मी ज्या पाऊलखुणा सोडून गेलो होतो त्याही आता दिसत नव्हत्या. त्या पाऊल खुणांची पाऊलवाट झाली होती.
पहिल्याप्रमाणेच साप दोरी होऊन पडला होता. बेडूक टप्प्यात यावा यासाठी कासवगतीने पुढे सरकत होता. मती गुंग झाल्याप्रमाणे बेडूक सापाकडे पाहत होता. मृत्यू समोर दिसल्यामुळे भ्रमिष्ठ झाला होता. उड्या मारत दूर जावे याचाही त्याला विसर पडला होता. आता गिळून टाकतो याला, असे म्हणत सापाने बेडकाच्या दिशेने झेप घेतली. पण कुणास ठाऊक कुठून एक मुंगूस आले. त्याने सापावर झेप घेतली. दोघांची खूप झटापट झाली. निर्जीव झालेला साप दोरीसारखा पडून राहिला.
मागच्याप्रमाणेच ओढा मासे धारेत धरून वाहत होता. बगळा ध्यान धरून धारेत उभा होता. मागून हलक्या पावलाने मगर आली. तिने बगळा पोटात ढकलून दिला. मगरीच्या जबड्यातला अक्राळविक्राळ मृत्यू दिसताच बगळ्याने डोळ्यांचे लोलक बंद करून घेतले. मगरीने मात्र डोळ्यांचे लोलक उघडले. तृप्तीची ढेकर दिली आणि खोल पाण्यात निघून गेली. गवत जोमाने वाढले होते. वाघ एका झाडाखाली विश्रांती घेत होता. ते पाहून हरीण समोर गवत दिसत असूनही गवताकडे पाहत नव्हती. वाघ थकून गेला होता. दूरवर दिसणाऱ्या हरिणीवर झेप घेण्याची त्याला इच्छा होतं नव्हती. एक कावळा वाघाच्या अंगावर बसला होता आणि वाघाच्या केसातून फिरणाऱ्या किड्यांवर ताव मारत होता. माझ्या पॉकेट ट्रान्झिस्टरवर, “ही दुनिया मायाजाल, मनुजा जाग जरा’ हे गाणं ऐकू येत होतं आणि डोळ्याचे लोलक बंद करून मी त्या सुरावटीत हरवून गेलो होतो. काळाचा लोलक मात्र काही घडलंच नाही अशा थाटात हेलकावे घेत होता.
विजय शेंडगे