मुंबई: राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात राज्याचे लक्ष लागलेलं वरळी मतदारसंघात काय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आदित्य यांच्या विरोधात गुरुवारी आरपीआय खरात गटाचे सचिन खरात यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज अजित पवार यांच्या सहमतीने दाखल केला असल्याचं सचिन खरात यांनी दैनिक प्रभात सोबत बोलताना सांगितले. त्यामुळे आघाडीकडून सचिन खरात हेच आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीये.
सचिन खरात हे मूळचे सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील आहेत. साहित्यिक शंकरराव खरात यांचे ते नातू आहेत. त्यांनी सर्वप्रथम मुंबई येथील इंदू मिलच्या जागेसाठी प्रथम आंदोलन केले होते. २०१२ पर्यंत ते रामदास आठवले यांच्यासोबत काम करत होते. मात्र, रामदास आठवले यांनी शिवसेनेसोबत युती केल्याच्या कारणावरून त्यांनी रिपब्लिकन पक्षासोबत फारकत घेऊन आपला नवीन आरपीआय (खरात गट) पक्ष स्थापन केला. सचिन खरात हे लोकसभेला काँग्रेस,राष्ट्रवादी सोबत आघाडीमध्ये होते.