तब्बल अडीच वर्षांच्या वाटाघाटीनंतरही तोडगा नाही
पुणे – वेतन आणि इतर विषयावर बॅंक कर्मचारी संघटना आणि व्यवस्थापनदरम्यान 30 महिन्यांपासून वाटाघाटी सुरू असूनही त्यावर सर्वमान्य तोडगा निघत नाही. त्यामुळे बॅंक कर्मचारी आंदोलन तीव्र करण्याच्या मनःस्थितीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बॅंक कर्मचारी संसदेचे अधिवेशन सुरू होणार असतानाच दि.1 आणि 2 फेब्रुवारी रोजी संप करणार आहेत.
अर्थसंकल्पातही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास 11 मार्चपासून तीन दिवसाचा संप केला जाणार आहे. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यानंतर 1 एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा संघटनांनी दिला आहे. भारतीय बॅंक संघ म्हणजे आयबीए आणि बॅंकांच्या नऊ संघटनांचा मंच असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन म्हणजे यूएफबीयूदरम्यान 13 जानेवारी रोजी झालेली बैठक अयशस्वी झाली.
बॅंक कर्मचाऱ्यांना पेस्लीप वर 20 टक्के वाढ हवी आहे, तर व्यवस्थापनाने 12.25 टक्के वाढ देऊ केली आहे. आठवड्यात पाच दिवस काम असावे, इतर भत्त्यांचा मूळ पगारात समावेश केला जावा, नवी पेन्शन योजना रद्द करावी आदी बॅंक कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत.