पुणे – यंदा महाराष्ट्र उन्हाच्या चटक्यात होरपळून निघणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने नुकताच जाहीर केला आहे. एप्रिल ते जून या कालावधीत राज्यात सरासरी तापमानात अर्धा ते एक अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णेतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.
भारतीय हवामान विभागातर्फे गेल्या चार वर्षांपासून पावसाबरोबर उन्हाळा आणि हिवाळ्याचा ही अंदाज वर्तविण्यात येत आहे. “मान्सून मिशन सिस्टिम’ या आधारावर देशातील 36 हवामान उपविभागांतील उन्हाळाच्या एप्रिल, मे आणि जून या तीनही महिन्यांमध्ये देशातील बहुतांश भागांत दिर्घकालीन सरासरीच्या तुलनेत कमाल आणि किमान तापमानाचा पारा वाढलेला असेल असा निष्कर्ष मान्सून मिशनच्या माहितीच्या हवामान शास्त्रज्ञांनी काढला आहे.