मुंबई – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. बेरोजगार आणि महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यना यंदाच्या अर्थसंकल्पाकडून मोठी आशा होती. त्यानुसार सरकारच्या वतीने बजेट सादर करण्यात आले. मोदी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत करत हा अर्थसंकल्प ‘सर्वजणहिताय’ असल्याचे म्हंटले आहे.
एकूणच राज्य सरकारने या अर्थसंकल्पाचे स्वागत केल्याचे पाहायला मिळत आहे. हा अर्थसंकल्प मध्यम वर्गीयांच्या इच्छापूर्तीचा असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा पाचवा अर्थसंकल्प होता.
काय म्हणाले नेमकं फडणवीस
आजचा अर्थसंकल्प हा अमृत कालातील सर्वजणहितायअशा संकल्पेनेवर आधारित अर्थसंकल्प आहे
गरीब,मध्यमवर्गीय,बेरोजगार,शेतकरी,उद्योजक आणि युवा अशा सर्वांचा विचार या अर्थसंकल्पाने केला आहे.
पुढच्या पंचवीस वर्षांमध्ये विकसित भारताकडे जाण्याचा रस्ता या अर्थ संकल्पाने दाखवलाय.
याला ग्रोथ बजेट,ग्रीन बजेट, लास्ट बजेट म्हणता येईल
दहा लाख कोटी रुपयांवरची गुंतवणूक देशात रोजगार निर्माण करेल
सर्वसामान्य टॅक्स भरणाऱ्या नागरिकांना अर्थसंकल्पातून मोठा दिलासा मिळाला आहे. या अर्थ संकल्पाद्वारे करपात्र उत्पन्नाची मर्यादा 7 लाखांनी वाढवण्याची घोषणा सीतारामन यांनी केली.त्यानुसार आता टॅक्स बाबतच्या स्लॅबमध्ये देखील बदल होणार आहे. मात्र हा सर्वसामान्यांसाठी फायदेमंद निर्णय ठरणार असल्याचं मत काही अर्थतज्ञ व्यक्त करत आहेत.
अर्थसंकल्पाच्या सुरुवातीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्राधान्य असलेले सप्तर्षी सांगितले. ज्यामध्ये सर्वसमावेशक विकास, शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमतांचा खऱ्या अर्थाने वापर करणे, हरित विकास, तरुणांचं सामर्थ्य आणि आर्थिक क्षेत्र अशा महत्वाच्या गोष्टींचा समावेश असल्याचे स्पष्ट केले.