श्रीनगर- इस्लामिक स्टेट या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने भारतातील घातपाती कारवायांसाठी नवीन गटाची घोषणा केली आहे. इसिसने भारतातील भूभागाचे नवीन “प्रांत’ही घोषित केले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये शोपियन जिल्ह्यातील आमशीपोरा येथे झालेल्या ताज्या संघर्षाच्या पार्श्वभुमीवर इसिसने ही फेरजुळणी केली आहे. इसिसने घोषित केलेल्या नवीन गटाचे नाव “विलायह ऑफ हिंद’ (भारतीय प्रांत) असे आहे. अमाक न्यूज एजन्सी या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. मात्र जम्मू काश्मीरमधील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळले आहे.
इस्लामी दहशतवाद्यांच्या कारवायांवर लक्ष ठेवणाऱ्या “साईट’ या गुप्तचर गटाच्या संचालिका रिटा काट्झ यांनी मात्र या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इसिसने घोषित केलेल्या प्रांतांच्या रचनेमध्ये आणि प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या सरकारी प्रांतांमध्ये काहीही साम्य नाही. मात्र तरिही याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
मध्यपूर्वेमध्ये इसिसचा पाडाव झाल्यावर भारतातील अस्तित्व आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. असे इसिसचा म्होरक्या अबु बक्र अल बगदादी याने पूर्वीही केले होते, असे रिटा काट्झ यांनी म्हटले आहे.