दिल्लीतील गोळीबार प्रकरणी प्रियांका गांधी यांची प्रतिक्रीया
नवी दिल्ली – जामिया मिलियाच्या निदर्शकांवर काल दिल्लीत एक अल्पवयीन मुलाने गोळीबार केला या प्रकरणावरून कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी भाजप सरकार व मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीच लोकांना गोळी मारा म्हणून भडकवल्यानंतर असे प्रकार होणारच. या गोळीबाराला सत्ताधारी पक्षाचे नेतेच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला असून आपण हिंसेच्या बाजुने आहोत की अहिंसेच्या बाजुने ते एकदा पंतप्रधान मोदींनी स्पष्ट करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
काल दिल्लीतील एका पिस्तुलधारी अल्पवयीन युवकाने ये लो आझादी असे म्हणत सीएए विरोधातील निदर्शकांवर गोळीबार केला. यावेळी तेथे शेकडो पोलिस उपस्थित होते पण त्यांनीही त्याला अडवण्याचा प्रयत्न केला नाही म्हणून भाजप सरकारवर सध्या टीकेची झोड उठवली जात आहे त्याच पार्श्वभूमीवर प्रियांकांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.या संबंधात त्यांनी म्हटले आहे की भाजप सरकारचे मंत्री आणि नेतेच लोकांना गोळीबार करण्यास आणि हिंसाचार करण्यास उद्युक्त करीत असतील असे प्रकार घडणारच आहे.
पंतप्रधांनांना नेमकी कशा स्वरूपाची दिल्ली हवी आहे हे त्यांनी एकदा स्पष्ट केले पाहिजे. त्यांना नेमका विकास हवा आहे की अराजक हेही त्यांनी एकदा स्पष्ट केले पाहिजे असेही प्रियांकांनी आपल्या ट्विटरवर म्हटले आहे.