मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील इतर आमदार आज पुन्हा एकदा गुवाहाटी दौऱ्यावर आहेत. त्यामुळे इकडे राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. त्यांच्या या दौऱ्यावरून विरोधकांनी जोरदार राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे काही आमदारांनी या दौऱ्याला दांडी मारल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. शिंदे गटात फूट पडल्याची किंवा काही आमदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर खोचक टीका केली आहे.
अंबादास दानवे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिंदे गटाला गुवाहाटी दौऱ्यावरून लक्ष्य केले आहे. “ज्याच्या त्याच्या आस्थेचा हा विषय आहे. पण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा, अतीवृष्टीचा प्रश्न आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना देण्यासाठी २२०० कोटींचा प्रस्ताव मंत्रीमंडळाकडे पडून आहे. त्यासाठी उपसमितीच्या बैठकीची आवश्यकता आहे. पण मुख्यमंत्र्यांना ही बैठक घेण्यासाठी वेळ नाही. जनतेचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नाही. पण देवदर्शनासाठी वेळ आहे. देवदर्शनाला आमचा काही आक्षेप नाही. पण सगळ्यात आधी जनता-जनार्दनच आपला परमेश्वर आहे. महाराष्ट्रानं हे सगळं बघावं”, असे अंबादास दानवे यावेळी म्हणाले.
दरम्यान, शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याच्या चर्चांवर उदय सामंतांनी केलेल्या विधानाची अंबादास दानवेंनी खिल्ली उडवली. “चर्चा काहीही असो, आम्ही सगळे एकसंघ आहोत. येताना कदाचित आमच्यासोबत जास्त लोक असतील”, असे उदय सामंत म्हणाले होते. त्यावरून दानवेंनी टोला लगावला. “उदय सामंतांना हे सांगावं लागतं की ते एकसंघ आहेत, यातच सगळ्या गोष्टी आल्या. त्यांच्या सांगण्याचा हाच अर्थ आहे की ते एकसंघ नाहीत”, असे दानवे म्हणाले.