पाटणा – बिहारची सत्ता राखल्यानंतर आता राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) त्या राज्यात नवे सरकार स्थापन करण्यास सज्ज झाली आहे. यानंतर पहिल्यांदाच नितीश कुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नितीश कुमार यांनी आपण मुख्यमंत्रीपदावर दावा केलेला नसून याबाबत एनडीए निर्णय घेईल. तसेच आपण निवृत्ती घेणार नसल्याचे स्पष्टीकरणही दिले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या अखेरच्या दिवशी नितीश यांनी मतदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला. ही माझी अखेरची निवडणूक आहे. शेवट चांगला तर सर्वकाही चांगले असल्याचे त्यांनी म्हटले होते. परंतु, नितीश कुमार यांनी अखेरची निवडणूक या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
ते म्हणाले कि, मी निवृत्तीबद्दल कधीही विधान केलेले नाही. मी प्रत्येक निवडणुकीच्या रॅलीत एकच गोष्ट सातत्याने सांगितली कि शेवट चांगला तर सर्वकाही चांगले. तुम्ही माझे भाषण ऐकले असेल तर तुम्हाला याची कल्पना येईल. भविष्यात आपण निवृत्त होणार असून आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, बिहारची सत्ता मिळवण्यासाठी एनडीए आणि विरोधकांच्या महाआघाडीत अतिशय अटीतटीची लढत झाली. त्यामध्ये काठावरचे बहुमत मिळवणाऱ्या एनडीएची सरशी झाली. सरकार स्थापनेची प्रकिया दिवाळीनंतर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याशिवाय, मुख्यमंत्रिपदाची धुरा पुन्हा जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार हेच सांभाळतील, असेही सूचित होत आहे. त्यामुळे सलग चौथ्या कार्यकाळासाठी मुख्यमंत्रिपद सांभाळण्यास नितीश सज्ज झाल्याचे सूचित होत आहे. नव्या कार्यकाळामुळे बिहारचे मुख्यमंत्रिपद सर्वांधिक काळ भुषवण्याचा मान त्यांना मिळू शकेल.