पुणे – नागरिकांच्या पैशांतून महापालिका प्रकल्प करत असते. मात्र, मोठे प्रकल्प उभारताना पालिका प्रशासनाने पुणेकरांना विश्वासात घेऊन या प्रकल्पांबाबत नागरिकांची बाजूही समजावून घ्यावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे.
याबाबतचे पत्र मंचाच्या वतीने सोमवारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यात आल्याची माहिती मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर आणि पर्यावरणतज्ज्ञ सारंग यादवाडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वेलणकर म्हणाले, “महापालिका पुणेकरांच्या पैशांतून अनेक मोठे प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पांमध्ये एचसीएमटीआर, समान पाणी योजना, नदीकाठ विकसन प्रकल्प, मुळा-मुठा नदी सुधार योजना अशा अनेक योजनांचा समावेश आहे. या योजना प्रशासकीय बाब म्हणून अधिकारी नियमानुसार मंजूर करतात. त्याची कामेही सुरू करतात. मात्र, त्यानंतर अनेकदा या योजन कागदावरच राहतात. या योजना शहरासाठी गरजेच्या आहेत का? त्याचा नागरिकांना खरंच फायदा होणार आहे का? याबाबत नागरिकांना काहीच कल्पना दिली जात नाही. मात्र, या प्रकल्पांसाठीचा निधी नागरिकच कर स्वरुपात देत असल्याने किमान नागरिकांसाठी आयुक्तांनी त्यांचे सादरीकरण करून नागरिकांची मते जाणून घ्यावीत, अशी मागणी वेलणकर यांनी केली.
शहरात नागरिकांच्या पैशातून कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांच्या परिणाम हा शहराची एकूण रचना आणि पर्यावरणावर होणार आहे. त्यामुळे महापालिकेने सामाजिक जबाबदारी म्हणून नागरिकांना या प्रकल्पांची माहिती देणे आवश्यक आहे, असे यादवडकर यांनी यावेळी सांगितले.