आमदार सुरेश गोरे : “घर टू घर’ जाऊन मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी
चाकण -खेड तालुका हा संतांची भूमी असलेला शेती प्रधान तालुका असून, या तालुक्यात मी आमदारपदी विराजमान झाल्यानंतर गुंडगिरी संपविली. त्यामुळे खेड तालुका हा आता कोणाच्या हातात दिल्यास सुरक्षित राहील, हे जनतेने ठरवावे. खेड तालुक्यातील जनतेचा सातबारा शाबूत ठेवण्यासाठी आता गुन्हेगारांसह त्यांच्या एजंटांना रोखण्याची हीचवेळ असल्याचे, आमदार गोरे यांनी सांगितले.
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमदेवार सुरेश गोरे यांनी खेड तालुक्यातील चिंबळी, मोई, निघोजे, कुरुळी, खराबवाडी, खालुंब्रे, सांगूर्डी, कान्हेवाडी, येलवाडी, नाणेकरवाडी, महाळुंगे इंगळे, आळंदी, सावरदरी आदि भागात “घर टू घर’ जावून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यावेळी मतदारांना जागृत करताना आमदार गोरे यांनी वरील आवाहन केले.
यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अशोक खांडेभराड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण मांजरे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शिवाजी वरपे, खेड तालुका प्रमुख रामदास धनवटे, चाकण शहर प्रमुख महेश शेवकरी, नगराध्यक्ष शेखर घोगरे, उपनगराध्यक्ष धीरज मुटके, खराबवाडीच्या माजी उपसरपंच नंदाताई कड, खालुंब्रे गावच्या सरपंच सोनल बोत्रे, जिल्हा परिषदेच्या सदस्या तनुजा घनवट, रुपाली कड, प्रकाश वाडेकर, आरपीआयचे जिल्हा सचिव सचिन वाघमारे, खेड तालुकाध्यक्ष संतोष नाना डोळस, युवा नेते दत्ता कंद, खेड पंचायत समितीचे सदस्य अमर कांबळे, अंकुश राक्षे, वैशाली जाधव, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका विजया शिंदे, उद्योजक सुभाष डांगले, संदीप घनवट, सुभाष मांडेकर, धोंडीभाऊ कुडेकर, संभाजी कुडेकर, नवनाथ शेवकरी, नंदकुमार गोरे, लक्ष्मण जाधव, विजया जाधव, हनुमंत कड, ज्योती कड, राजेंद्र खेडकर, गोरक्षनाथ कांडगे आदींसह गावोगावचे सरपंच उपसरपंच, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार गोरे म्हणाले की, जनतेची केलेली कामे हीच माझ्या कामाची पोहोच पावती असून, उभ्या आयुष्यात मला कधीच खुर्चीचा मोह झाला नाही, असे त्यांनी नमूद केले.
युती धर्म न पाळणाऱ्यांवर कारवाई अपेक्षित
चाकण येथील शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत शिवसेनेनेचे जिल्हा प्रमुख माऊली कटके म्हणाले की, “युती धर्म’ न पाळता बुट्टेपाटील यांच्यासह भाजपचे अन्य कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारीही बंडखोर उमेदवार देशमुख यांच्या प्रचारात उघडपणे सहभागी झाले आहेत. अशा कार्यकर्त्यांवर भाजपने शिस्तभंगाची कारवाई करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले. तर युती धर्म न पाळणाऱ्या कार्यकर्त्यांचा या बैठकीत निषेध व्यक्त करण्यात आला.