पिंपरी: संपूर्ण राज्य ‘कोरोना’ विरोधात लढाई लढत आहे. या लढाईला जनतेचाही मोठा पाठींबा मिळत असून सामुहिक शक्तीच्या जोरावर कोरोनाला आपण निश्चितच हरवू, असा ठाम विश्वास मा. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजित पवार यांनी व्यक्त केलाय.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या वॉर रूमला भेट देऊन तेथील कार्यप्रणालीची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी आज घेतली. त्यानंतर त्यांनी शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते नाना काटे, आमदार अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महिला शहराध्यक्ष वैशालीताई काळभोर, नगरसेवक राजू मिसाळ, पालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, पालिका व वायसीएम अधिकारी यावेळी उपस्थित होते.
कोरोनामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. योग्य काळजी घेतल्यास तसेच स्वच्छता राखून शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन केल्यास आपण कोरोनावर मात करू शकतो. ही परिस्थिती राजकारण करण्याची नाही. नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याची ही वेळ आहे. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यातील उद्योग सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र कामगार परराज्यात निघून गेल्यामुळे काही अडचणी येत आहेत. वेळ लागेल, मात्र परिस्थिती निश्चितच पूर्वपदावर येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
स्वत:च्या जिवाची पर्वा न करता पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य विभागातील कर्मचारी, सफाई कामगार कोरोनामुक्तीसाठी प्रयत्न करत आहेत. या लढ्यात सर्वांचा पाठींबा आणि साथ आजपर्यंत मिळाली आहे, तशीच कायम ठेवल्यास आपण कोरोनावर निश्चितच विजय मिळवू, अशी हमी त्यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहरातील कंपन्यांमध्ये पुण्यातील अनेकजण काम करतात. मात्र पुण्यातून पिंपरी-चिंचवडमध्ये येण्यास त्यांना अडचण येत आहे. त्याबाबत शासकीय पातळीवर काही मार्ग काढता येतो का, याबाबत प्रयत्न करणार असून इतरही जे काही औद्योगिक वसाहतीमधील कंपनी चालक व कामगारांचे प्रश्न समोर येत आहेत त्यावरही तात्काळ मार्ग काढला जाईल, आश्वासन अजित पवार यांनी दिले.