मुंबई : राज्यातील विद्यापाठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न करोनामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. परीक्षा घ्यायच्या की नाही, यावरून बराच खल सुरू आहे. त्याच मुद्यावर शिवसेनेचे नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी अग्रलेखातून भूमिका मांडली. त्यांच्या भूमिकेचे भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी स्वागत केले. त्याचबरोबर आभारही मानले आहेत.
राज्यातील विद्यापाठांमध्ये विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने सुरूवातीला घेतला होता. विद्यापीठ अनुदान आयोगानं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राज्य सरकारने या निर्णयात बदल केला. ही परीक्षा न घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना देण्याची इच्छा आहे, त्यांची परीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले. मात्र, राज्य सरकारच्या निर्णयाला भाजपाने विरोध केला. यासंदर्भात भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी राज्यपालांचीही भेट घेतली होती.
हीच ती वेळ!!
पदवी अंतिम वर्ष परिक्षा आणि ATKT असलेल्या 40% विद्यार्थ्यांचे भवितव्य काय? विद्यार्थ्यांच्या या “शैक्षणिक आरोग्याची” काळजी करणारी भूमिका आम्ही मांडली. सामनाचे कार्यकारी संपादक @rautsanjay61 यांनी ही विद्यार्थ्यांची काळजी अग्रलेखात अधोरेखित केली.
त्याबद्दल आभार! 1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 4, 2020
दरम्यान, विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याच्या मुद्यावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सामनातून भूमिका मांडली. राऊत यांच्या भूमिकेचं शेलार यांनी स्वागत केले आहे. “हीच ती वेळ! पदवी अंतिम वर्ष परीक्षा आणि एटीकेटी असलेल्या ४० टक्के विद्यार्थ्यांचे भवितव्य काय? विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक आरोग्याची काळजी करणारी भूमिका आम्ही मांडली. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनीही विद्यार्थ्यांची काळजी अग्रलेखात अधोरेखित केली. त्याबद्दल आभार! उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत मात्र, योग्य वेळी निर्णय घेऊ असं सांगत आहेत. प्रश्न लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे. त्यामुळे संजय राऊत यांनीच मंत्र्यांना सांगावे की, निर्णय घेण्याची ‘हीच ती वेळ’, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.