लाहोर -जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारतीय फलंदाजीची जी वाताहत झाली ती आयपीएल स्पर्धेचाच परिणाम म्हणले पाहिजे, असा सूर पाकिस्तानचे माजी कसोटी क्रिकेटपटू व समालोचक रमीझ राजा यांनी लावला आहे. भारतीय क्रिकेटपटू टी-20 क्रिकेटच्या मानसिकतेतून बाहेरच आलेलेल नाहीत हेच यातून स्पष्ट दिसते, असेही ते म्हणाले.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा व त्याची संघ निवड साफ चुकली. तसेच ऑस्ट्रेलियाचे 3 फलंदाज स्वस्तात बाद झालेले असताना त्याने जे दडपण टाकायला हवे होते, त्यातही तो चुकला. तसेच ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह स्मिथ व ट्रेव्हीस हेड ज्या प्रकारे फलंदाजी करत होते त्यासाठी वेगळी क्षेत्ररचना ठेवणे गरजेचे होते. त्याबाबतीतही रोहित गोंधळलेला दिसला, असेही राजा यांनी म्हटले आहे.
या स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यापूर्वी भारतीय संघाने इंग्लंडमध्ये किमान दोन सराव सामने खेळायला हवे होते म्हणजे खेळाडूंना तेथील खेळपट्टी व वातावरणाचा अंदाज आला असता. बीसीसीआयने इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळावर दडपण आणून दोन किंवा तीन दिवसांचे किमान दोन सराव सामने आयोजित करण्यास सांगणे गरजेचे होते. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आंतरराष्ट्रीय असो किंवा काउंटी इंग्लंडमध्ये जास्त खेळतात त्यामुळे त्यांना तेथील सर्व मैदानांचा अभ्यास असतो.
नाणेफेकीच्या वेळी रोहितला खेळपट्टी ओळखताच आली नाही व त्याने पहिल्यांदा गोलंदाजी स्वीकारण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेतला. वास्तविक ही खेळपट्टी कोरडी वाटत होती व त्यावर सुरुवातीची 8 ते 10 षटके वगळता वेगवान गोलंदाजांना फारशी मदत मिळेल असे वाटत नव्हते. त्यामुळे रोहितने एक वेगवान गोलंदाज कमी करून एक फिरकी गोलंदाज संघात घ्यायला हवा होता, असेही राजा
यांनी सांगितले.