मुंबई: नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत खासदार शिवसेनेचे आणि काम शरद पवारांचं करतात. त्यांनी राज्य सरकारच्या गलथान कारभारापासून लक्ष विचलित करण्यासाठी पवारांची मुलाखत घेतली, असा आरोप देखील राणे यांनी केला आहे.
नारायण राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. शिवसेनेमुळे भाजपाचे १०५ आमदार आले हे कोणाला खरं वाटेल, असे राणे म्हणाले. संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये पवार यांनी शिवसेनेमुळे भाजपाचे १०५ आमदार निवडून आल्याचा दावा केला होता.
राणे म्हणाले देशात, इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहे. भारतात ९ लाख रुग्ण त्याच्या एक तृतियांश रुग्ण राज्यात आहेत. लोकांचे मृत्यू होत आहेत. याबाबत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला नाही. आणि शरद पवारही याबाबत बोलले नाही.
लोक मृत्युमुखी पडत असताना संजय राऊत हसत-खेळत मुलाखत घेत आहेत. या परिस्थितीची नैतिक जबाबदारी कोणाची आहे? याबद्दल कोणी बोलत नाही, हे राज्य कौरवाचं आहे, लवकरच कौरवांचा राज्य जाईल असा दावा नारायण राणेंनी केला.