मुंबई – डॉ. मनमोहन सिंह यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातील उच्चांकी विकासदर पाहून, पोटशूळ झालेल्या मोदी सरकारने विकासदराची वाढ मोजण्याचे परिमाण बदलून अपयश झाकण्याचा प्रयत्न केला. पण तो ही अपयशी ठरला. यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन केले आहे, अशा शब्दांत कॉंग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिले.
याचबरोबर थोरात यांनी विविध मुद्यांवरून मोदी सरकारवर देखील निशाणा साधला आहे. थोरात म्हणाले, प्रत्येक तिमाहीत देशाच्या विकासदर हा मोदींच्या विश्वासहर्तेप्रमाणे वेगाने घसरत आहे. “अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली रसातळ काय असतो, याची अनुभूती जनतेला झाली आहे. याच तिमाहीत देशाच्या जीडीपीने उणे 23.9 टक्के अधोगतीचा दर गाठलेला आहे. गेल्या सहा वर्षात भारताच्या विकास दराला सातत्याने उतरती कळा लागली असल्याचेही त्यांनी सांगितले.
देशाच्या इतिहासात प्रथमच उणे 9 विकास दर राहण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय संस्था व्यक्त करत आहेत. गेल्या 46 वर्षातील उच्चांकी बेरोजगारीचा दर हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालीच भारताने नोंदवला आहे. दरवर्षी 2 कोटी रोजगार देणार असे आश्वासन देणाऱ्या मोदींनी आतापर्यंत 12 कोटी रोजगार निर्माण करण्याऐवजी असलेले 12 कोटी रोजगार घालवले. जीएसटी परतावा राज्यांना देणे कायद्याने बंधनकारक असताना केंद्र सरकार हात वर करत आहे. मोदींच्या प्रतापाने देश आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे, असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशात पहिल्यांदाच दोन आकडी जीडीपी नोंदवला, ज्यांच्या 10 वर्षाच्या काळात सरासरी विकास वाढीचा दर 7.5% राहिला, त्या डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली देश रसातळाला गेला, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी काल केली होती.