नवी दिल्ली -निवडणूक रणनीतीज्ञ प्रशांत किशोर यांनी पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्याची वेळ निवडणुका लढवण्याची नव्हे; तर करोनाशी लढण्याची आहे. विधानसभा निवडणुका घेण्याची घाई करून जनतेचा जीव धोक्यात घालू नका, असे किशोर यांनी नितीश यांना उद्देशून म्हटले आहे.
बिहारमधील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणे अपेक्षित आहे. करोना संकटामुळे त्या निवडणुकांबाबत काय निर्णय होणार याविषयी मोठी उत्सुकता आहे. नितीश यांचा जेडीयू आणि भाजप हे बिहारमधील सत्ताधारी मित्रपक्ष निवडणुकांसाठी सज्ज असल्याचे म्हणत आहेत. एवढेच नव्हे तर, निवडणुकांची तयारी सुरू करत त्यांनी पक्षस्तरीय बैठकांचे सत्रही आरंभले आहे.
मात्र, राजदचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी निवडणुका लांबणीवर टाकण्याची मागणी केली आहे. सद्यस्थितीत निवडणुका घेणे उचित होणार नाही, असे म्हणत लोजपचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी तेजस्वी यांच्या सुरात सूर मिसळला. लोजप हा सत्तारूढ आघाडीचा घटक असल्याने चिराग यांच्या भूमिकेला महत्व आहे.
निवडणुकांवरून बिहारमध्ये राजकारण सुरू झाल्याचे चित्र असतानाच किशोर यांनी त्याची रंगत आणखी वाढवली आहे. देशातील अनेक राज्यांप्रमाणे बिहारमधील करोनाविषयक स्थिती बिघडली आहे. मात्र, बिहारमधील सरकारी यंत्रणांचा मोठा भाग निवडणुकांच्या तयारीत गुंतला आहे, अशी टिप्पणी त्यांनी ट्विटरवरून केली.
एकेकाळी नितीश यांचे निकटवर्तीय अशी किशोर यांच ओळख होती. मात्र, त्यांच्यात मतभेद निर्माण झाल्यानंतर किशोर यांची जेडीयूमधून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर ते सातत्याने विविध मुद्द्यांवरून नितीश यांच्यावर टीकेची झोड उठवत आहेत. ‘