नवी दिल्ली – जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. भारताच्या कुटनितीचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. मोदी म्हणाले, ‘हा नवीन भारत आहे. हा नवीन भारताचा आवाज आहे. भारताने केलेल्या पाचव्या प्रयत्नात चीनला हार मानावी लागली. ही केवळ सुरुवात आहे, पुढे बघा आणखी काय-काय होते’ अशी प्रतिक्रिया देऊन मोदींनी आनंद व्यक्त केला.
‘आझहरला आतंरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी मागील दहा वर्षांपासून भारत प्रयत्न करत होता. या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश मिळाले आहे. चीनने प्रत्येकवेळी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र आंतरराष्ट्रीय दबावापुढे चीनला देखील झुकावे लागले आहे. यापूर्वीचे सरकार रिमोट कंट्रोलवर चालत होते. त्या सरकारमध्ये पंतप्रधानांचे कोणीच ऐकत नव्हते. मात्र आता संयुक्त राष्ट्रात काय घडले, ते संपूर्ण देशाने पाहिले आहे. देशातील 130 कोटी जनतेचा आवाज आज जगाने ऐकला आहे.’ असे म्हणून मोदींनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.