नोकरी, पासपोर्ट, व्हिसासाठी भविष्यात होऊ शकतो त्रास
पिंपरी – काहीजण निव्वळ टाइमपास म्हणून शहरात फिरत असतात. गेल्या 20 दिवसांमध्ये अशा एक हजार 669 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र ही टवाळखोरी भविष्यात या तरुणांना चांगलीच महागात पडण्याची चिन्ह आहे. अनेक कामांसाठी चारित्र्याचा दाखला अनिवार्य असतो. जर तुमच्यावर गुन्हा दाखल असेल तर आगामी काळात नोकरी, पासपोर्ट किंवा व्हिसा घेताना याचा विचार होणार असल्याने तरुणांना ही टवाळखोरी चांगलीच महागात पडणार आहे. अजूनही काही तरुण बाहेर पडत आहेत. जर पोलिसांच्या तावडीत सापडलात तर करियरसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात.
करोना या साथीच्या आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करीत संचारबंदीचे आदेश दिले आहेत. या आदेशातून जीवनावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. मात्र काहीजण केवळ टाईमपास म्हणून शहरात फिरत आहेत. या फिरण्याला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी शहरातील रस्त्यावर खासगी वाहनांना येण्यास मनाई करणारा आदेश जारी केला आहे. एवढेच नव्हे तर अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच इंधन देण्याची सूचना पेट्रोल पंप मालकांना दिली आहे. मात्र तरीदेखील रस्त्यावर फिरणाऱ्या टवाळखोरांचे प्रमाण कमी झालेले नाही. यामुळे पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरवात केली आहे. मात्र हे गुन्हे भविष्यात तरुणांना चांगलेच महागात पडणार आहे.
संचारबंदीच्या काळात फिरणाऱ्यांवर भा. द. वि. कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे. या गुन्ह्यात एक हजार दंड आणि सहा महिन्यांची कैद अशी शिक्षेची तरतूद आहे. मात्र या कलमांसोबतच पोलीस राष्ट्रीय आपत्ती कायदाही गुन्ह्यामध्ये लावत आहे. या गुन्ह्यामध्ये एक वर्ष शिक्षेची तरतूद आहे. न्यायालय या दोन्ही शिक्षा सुनावू शकत असल्याने आगामी काळात टवाळखोरांना दीड वर्ष कैदेची शिक्षा होऊ शकते, असे गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त राजाराम पाटील यांनी सांगितले.
सध्या कोठेही नोकरी करायची असल्यास किंवा नोकरी न मिळाल्यास बॅच बिल्ला काढायचा असल्यास सर्वात अगोदर चारित्र्याचा दाखला मागितला जातो. मात्र अशा व्यक्तीवर गुन्हा दाखल असल्यास नोकरी मिळविण्यात अडचण येऊ शकते. शहरातील काही सुशिक्षित तरुणही बाहेर फिरत आहेत. भविष्यात ज्यांना नोकरी किंवा शिक्षणानिमित्त विदेशवारी करायची आहे, अशांना मोठ्या अडचणी येऊ शकतात. कारण अशा प्रकारचे गुन्हे पासपोर्ट काढण्यासाठी किंवा इतर देशांचा व्हिसा मिळविण्यासाठी अडचण येऊ शकते. यामुळे टवाळखोरांना संचारबंदीच्या काळात रस्त्यावर फिरणे महागात पडू शकते.