मुंबई: कोरोना संकटाने देशभर हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्राचे सरकारही ‘कोरोना’चा पराभव करण्यासाठी शर्थ करीत आहे. बहुधा, महाराष्ट्र सरकारचे यश, लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांना सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरू केले आहे, अशी टीका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.
आदित्य ठाकरे म्हणाले, सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिशः माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे. मुळात या सर्व प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
सिनेसष्टी म्हणजे’ बालीवृड ‘हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत. हा काही गुन्हा नाही. सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू दुर्दैवी तितकाच धक्कादायक आहे. मुंबईचे पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहेत व महाराष्ट्राच्या पोलिसांना जागतिक प्रतिष्ठा आहे, पण ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही तेच लोक याप्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवीत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.
आदित्य ठाकरे म्हणाले, मी हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून सांगू इच्छिता. महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असे कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. या प्रकरणाची कुणाकडे काही विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांना द्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील. अशाप्रकारे चिखलफेक करून सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल,या भ्रमात कोणी राहू नये, असे देखील आदित्य ठाकरेंनी बजावले.