नवी दिल्ली – भारतात दिवसेंदिवस करोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढतच चालली आहे. करोनाची लस विकसित करणाऱ्या कंपन्यामध्ये भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस आघाडीवर आहे. पहिला टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल यशस्वी झाली आहे. परंतु, दुसऱ्या टप्प्यातील चाचणीबाबत भारत बायोटेकने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
माहितीनुसार, भारत बायोटेकने कोवॅक्सिन लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणी संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच याआधी ७५० स्वयंसेवकांवर कंपनी चाचणी करणार होती, पण आता फक्त ३८० स्वयंसेवकांना लसीचे डोस देण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे. याशिवाय चाचणी घेतली जाणाऱ्या साइट्सची संख्याही कमी करण्यात आली आहे. दुसरा टप्पा चाचणी संख्या कमी केल्यामुळे लवकर संपेल आणि तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल. यामुळे कोवॅक्सिनच्या चाचणीचा कालावधीदेखील कमी होईल.
कंपनीने हा निर्णय पहिल्या टप्प्यातील स्वयंसेवकांमधील सेरोकोव्हर्जन किंवा इम्यूनोजेनिसिटीच्या आधारे घेतल्याचे सांगितले आहे. ३७५ निरोगी स्वयंसेवकांना पहिल्या टप्प्यात कोवॅक्सिन लसीचा डोस देण्यात आला होता. त्यानंतर या स्वयंसेवकांना डोस देण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील चाचणीची प्रक्रिया सुरु होती. ताप आणि शारिरीक वेदना याशिवाय इतर कोणताही मोठा त्रास स्वयंसेवकांना जाणवला नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. कोवॅक्सिन ही २-डोसची लस असून ती १४ दिवसांच्या अंतराने दिली जाण्याची योजना आहे.
दरम्यान, अद्याप पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील डेटा प्रसिद्ध किंवा सार्वजनिक करण्यात आलेला नाही.