नवाब मलिक यांचा आरोप
मुंबई (प्रतिनिधी) – राज ठाकरे यांच्यावर भाजप सरकार राजकीय आकसातून कारवाई करत आहे. आपल्याविरोधात जो बोलेल त्यांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रकार आहे. माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यावरही सरकारच्या चुकांवर बोट ठेऊ नये यासाठीच कारवाई केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.
माजी केंद्रीय मंत्री व जेष्ठ कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांना सीबीआयने बुधवारी रात्री अटक केली. तर दुसरीकडे मनसेप्रमुख राज ठाकरे यांना गुरुवारी ईडीने चौकशीसाठी पाचारण केले. या दोन्हीही नेत्यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या चुकांवर बोट ठेवलेले आहे. त्यापार्श्वभूमिवर प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिक यांनी राज ठाकरे व पी. चिदंबरम यांच्यावरील चौकशीवरून भाजपावर टिकास्त्र सोडले.
नवाब मलिक म्हणाले, विरोधकांना संपवून टाकणे हे मोदी मॉडेल आहे. तुम्ही तोंड बंद ठेवा नाहीतर तुम्हाला संपवून टाकू, असा संदेश भाजप सरकार देत आहे. हे फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत असे घडत आहे. सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री येड्डीयुरप्पा, रेड्डी बंधू यांच्यासह बंगालमधील चिटफंड घोटाळ्यातील मुख्य आरोपी मुकुल रॉय यांच्यावर तपासयंत्रणांनी ठपका ठेवल्यानंतरही त्यांची चौकशी होत नाही. राज ठाकरे ईव्हीएमबाबत मुद्दे उपस्थित करत आहेत, तर चिदंबरम हे अर्थव्यवस्थेबाबत दोष दाखवून देत आहेत. त्यामुळेच मोदी सरकार सूडाच्या भावनेतून कारवाई करत आहे, असे मलिक म्हणाले.
दमानियांनाही लगाविला टोला
राज ठाकरे यांच्या कुटुंबियाविषयी वादग्रस्त ट्विट करणाऱ्या अंजली दमानिया यांचा समाचार नवाब मलिक यांनी घेतला. राज ठाकरे कुटुंबवत्सल आहेत. त्यामुळे घरातील सदस्य काळजीपोटी राज यांना ईडीच्या कार्यालयापर्यंत गाडीतून सोडायला गेले तर त्यात काय वावगे आहे? असा सवाल करून मलिक म्हणाले की, दुसऱ्याच्या घरात काय चालले आहे हे पाहण्यापेक्षा आपल्या घरात काय सुरू आहे ते पाहावे, मगच दुसऱ्यांच्या घराबाबत भाष्य करावे, असा टोला मलिक यांनी अंजली दमानिया यांना लगावला.