Modi Government – केंद्र सरकारच्या व्यक्तिगत केंद्रित परराष्ट्र धोरणामुळे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप करत काँग्रेसने केंद्र सरकारवर सडकून टीका केली. पश्चिम आशियातील संघर्षात पाकिस्तानची मध्यस्थ म्हणून वाढलेली सक्रियता हे मोदी सरकारच्या राजनैतिक अपयशाचे लक्षण असल्याचे सांगत, काँग्रेसने पंतप्रधानांचा उल्लेख विश्वगुरु ऐवजी विश्वफोनी असा केला. नुकत्याच झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचा उल्लेख दलाल (मध्यस्थ) असा केला होता. या विधानाचा संदर्भ घेत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ज्या देशात लोकशाहीची थट्टा उडवली जाते, ज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे आणि जो देश दहशतवादाचा सुरक्षित अड्डा म्हणून ओळखला जातो, अशा पाकिस्तानला आज जागतिक स्तरावर मध्यस्थ म्हणून महत्त्व मिळणे ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताला मिळालेल्या लष्करी यशानंतरही, राजनैतिक पातळीवर पाकिस्तानला रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचा दावा त्यांनी केला. जयराम रमेश यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हाऊडी मोदी आणि नमस्ते ट्रम्प सारख्या भव्य कार्यक्रमांनंतरही भारताला नेमका काय फायदा झाला, असा सवाल त्यांनी विचारला आहे. अमेरिकेला भारतीय बाजारपेठेत सवलती देऊनही भारताचा राजनैतिक प्रभाव कमी होत असून, पंतप्रधान केवळ एक दुबळे नेते म्हणून समोर येत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. सध्या पाकिस्तानमध्ये सौदी अरेबिया, इजिप्त आणि तुर्की या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची महत्त्वाची शिखर परिषद पार पडत आहे. पश्चिम आशियातील शांततेसाठी पाकिस्तान सातत्याने इराण आणि इतर मित्रराष्ट्रांच्या संपर्कात आहे. एकीकडे भारत स्वतःला जागतिक नेता मानत असताना, दुसरीकडे शेजारील अस्थिर देश शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेत आहे, ही बाब भारताच्या परराष्ट्र धोरणाचे दिवाळे निघाल्याचे लक्षण असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.