नागपूर – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यातील लोणावळा येथे केलेल्या वक्तव्याने कालपासून महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी लगावलेल्या टोल्याने नाना पटोलेंवर चौफेर टीका होऊ लागली होती. त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नाना पटोले यांच्यावर प्रतिहल्ला केला. त्यानंतर नाना पटोले यांनी या प्रकरणी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा नाना पटोले यांनी केला आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मनगढत कहाण्या रचून आघाडी सरकारमध्ये फूट पडण्याचा डाव सुरू आहे. पण विरोधकांचा हा डाव यशस्वी होणार नाही, अशा शब्दात नाना पटोले यांनी भाजपवर पलटवार केला.
पटोले यांनी म्हटलं की, मी परवा पुण्यात होतो. त्यावेळी कार्यकर्त्यांनी काही तक्रारी केल्या होत्या. स्थानिक पातळीवर त्रास होत असल्याचं कार्यकर्ते सांगत होते. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, दौरे सुरू आहेत. काँग्रेसला प्रचंड प्रतिसाद वाढला आहे. त्याचा रिपोर्ट रोज मुख्यमंत्र्यांकडे जातो. हा रिपोर्ट केवळ राज्य सरकारकडेच नाही तर केंद्र सरकारडेही जात असतो.मी प्लेनली बोललो होतो. मात्र त्याचा विपर्यास केला गेला, असं पटोले म्हणाले.
महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे हे त्यांना माहीत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. मी कुठे काय करतो ते सगळं त्यांना माहीत आहे”, असं म्हणत नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला होता.