नितीन गडकरी यांची महाराष्ट्र विकास आघाडीवर टीका
नागपूर : हे तिन्ही पक्ष आमच्या विरोधात एकवटले आहेत, याचाच अर्थ आम्ही सामर्थ्यवान आहोत, असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ठाकरे सरकारवर त्यांच्या अनोख्या अंदाजात टीका केली.
केंद्रात पारित करण्यात आलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी आज नितीन गडकरी हे नागपुरातील जनतेशी संपर्क साधला. यावेळी गडकरींनी शिवसेनेवर आणि सध्याच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर जोरदार घणाघात केला.
नितीन गडकरी म्हणाले, हे तिन्ही पक्ष आमच्या विरोधात एकवटले आहेत, याचाच अर्थ आम्ही सक्षम आहोत, सामर्थ्यवान आहोत. आम्हाला काहीही अडचण नाही, आम्ही लढायला तयार आहोत. परंतू या तिन्ही पक्षांच्या विचारात ताळमेळ नाही.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, बांग्लादेशी नागरिकांना मुंबईतून बाहेर काढा. मात्र, आता शिवसेना नागरिक्त सुधारणा कायद्याची अंमलबजावणी करायला तयार नाही. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले म्हणून हिंदुत्व, मराठी माणूस हे सगळे विचार शिवसेने सोडून दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातला मराठी माणूस, हिंदुत्व प्रेमी जनता शिवसेनेवर नाराज आहे.
एकीकडे, शिवसेना सावरकरांना मानते. दुसरीकडे, कॉंग्रेस सावरकरांचा अपमान करणारे वक्तव्य करते. मात्र, शिवसेना काही करु शकत नाही. शिवसेनेला ही हतबलता, दुर्बलता जी आली आहे. त्याचे कारण म्हणजे शिवसेनेने सत्तेत त्यांचे सहकार्य केले. त्यामुळे आज त्यांना त्यांचे विचार सोडावे लागले आहेत. त्यामुळे हे सरकार आपल्या बोजाने डुबल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित, असे म्हणत त्यांनी निशाणा साधला.