माजी खासदार राजू शेट्टींची सरकारवर टीका
कोल्हापूर : गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती जाहीर केली होती. यानंतर शेतकऱ्यांना शासनाने काही आश्वासने दिली होती. यात कर्जमाफी, कर्ज पुनर्गठन, वीज बिल माफ, व्याज माफी आणि नुकसान भरपाई अशा मदतींची घोषणा केली होती. परंतु अद्याप यातील एकही घोषणा सरकारने पूर्ण केल्याचे दिसत नाही. अशी प्रतिक्रिया माजी खासदार तथा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.
हे सरकार फक्त घोषणांवर घोषणा करत आहे पण प्रत्यक्षात हे सरकार शेतकऱ्यांना मदत पोहचवण्यास अपयशी ठरले आहे, असाही आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.
ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुराच्या काळात महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी जाहीर केली, त्याचा शासन निर्णय झाला पण अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे आता सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, पण त्या आदेशांची कारवाई होणार कि नाही, याची शंका वाटत आहे, असेही राजू शेट्टी बोलताना म्हणाले.