नवी दिल्ली – गेले आठ महिने सोमालियातील एका कंपनीने 33 भारतीय कामगारांना तेथे जबरदस्तीने डांबून ठेवले होते. तथापि, त्यांच्या सुटकेसाठी नैरोबीतील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने प्रयत्न हाती घेतले आहेत. त्यांची लवकरच सुटका होईल अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी आज येथे दिली.
गेले दहा महिने हे कर्मचारी सोमालियातील कंपनीत कामाला होते. पहिले दोन महिने कंपनीने त्यांना चांगली वागणूक दिली पण नंतर मात्र आठ महिने त्यांनी या कर्मचाऱ्यांना वेतन दिले नाही आणि त्यांना कंपनी सोडून जाण्यासही मनाई करण्यात आली. सोमालियातील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांना याविषयी सूचना देण्यात आल्या असून हे अधिकारी आता त्या कर्मचाऱ्यांची मदत करीत आहेत असे एस जयशंकर यांनी सांगितले.