नवी दिल्ली – गेल्या नऊ महिन्यात रेल्वेला करोनाचा मोठा फटका बसला असून त्यांचे देशभरातील किमान तीस हजार कर्मचारी करोनाग्रस्त झाले असून सातशेहून अधिक कर्मचाऱ्यांचा यात मृत्यू झाला आहे अशी माहिती रेल्वेच्यावतीने देण्यात आली आहे.
रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले की, कर्मचाऱ्यांना करोनाची मोठ्या प्रमाणात लागण झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर आम्ही रेल्वेच्या प्रत्येक विभागात करोना उपचार केंद्र सुरू करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पण या काळात काही कर्मचाऱ्यांचा दुर्देवाने मृत्यू झाला.
करोना विरोधातील लढाईत या कर्मचाऱ्यांनी योध्यासारखे काम केले असे गौरवोदगारही त्यांनी काढले. ते म्हणाले की रेल्वे कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी आम्ही एकूण 74 रूग्णालये उभारली आहेत. साथीच्या रोगात दगावलेल्या कर्मचाऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा नियम नसल्याने मृत्य कुटुंबियांच्या कर्मचाऱ्यांना नुकसानभरपाई दिली गेली नाही असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.