राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची माहिती
कराड – सातारा, सांगली, कोल्हापूर याठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होवून अनेकांची वाताहात झाली असून त्यांच्या मदतीसाठी शासन सर्वतोपरी मदत करीत आहेतच. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे व युवा सेना प्रमुख अदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेहमीच सर्वसामान्यांसाठी धावून येत असते.
या पूर परिस्थितीतही शिवसेनेच्या माध्यमातून तीस टीम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यरत असल्याची माहिती गृहनिर्माण उच्च व तंत्रशिक्षणमंत्री रवींद्र वायकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, तहसीलदार अमरदीप वाकडे, नितीन काशीद, रामभाऊ रैनाक, शशिकांत करपे यांचेसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री वायकर म्हणाले, कृष्णा नदीला आलेल्या महापूराचा फटका कराडमधील पाटण कॉलनीतील सखल भागात असलेल्या घरांसह झोपडपट्ट्यांना बसला आहे.
यामध्ये या लोकांची मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून येथील लोकांचे आतोनात हाल झाले आहेत. शिवसेनेने आपला मदतीचा हात पुढे करीत बांधीलकी जपली आहे. पूर परिस्थितीत लोकांना वाचविण्याचे काम एनडीआरएफचे जवान करीत होते. शिवसेनेच्या माध्यमातून कराड तालुक्यात चार टीम दाखल झालेल्या असून या टीमच्या माध्यमातून कराड तालुुक्यातील 1 हजार 53 बाधित लोकांना शिवसेनेच्या वतीने मदत केली जाणार आहे. पाटण कॉलनीतील स्थलांतरीत 80 कुटुंबांना गरजेच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच घरांच्या पडझडी झालेल्या कुटुंबांना आणि कुंभार समाजाला ताडपत्रीचे वाटप करण्यात आले असल्याचे मंत्री वायकर यांनी यावेळी सांगितले.