शिरूर (प्रतिनिधी) – शहरात फळ, भाजीपाला विक्रेते व काही दुकानदारांकडून मुजोरी सुरूच आहे. सोशल डिस्टन्स न पाळता त्यांचे दैनंदिन व्यवहार सुरू आहेत. त्यात नगरपरिषदेच्यावतीने रविवारी (दि.26) संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता; मात्र विक्रेते व ग्राहकांनी त्याला हारताळ फासला.
अक्षय तृतीयानिमित्त रविवारी (दि.26) शिरूर शहरात आंबा खरेदी करण्यासाठी व मातीचे घट घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सकाळी सकाळीच गर्दी केली होती. लॉकडाऊन असताही अनेक फळ विक्रेते खुलेआम फळ विक्री करीत होत. तर काही दुकानदार शटर उचकटून लोकांना किराणामाल देत असल्याचे दिसून आले. यावेळी कुठले सोशल डिस्टन्स पाळले जात नव्हते. शहरात नगरपरिषदेच्या वतीने वतीने संपूर्ण लॉकडाऊन पाळला होता; परंतु विक्रेत्यांनी यांनी याबाबत कुठलीही गंभीरता न घेता दुकाने उघडी ठेवली होती. तर शहरात कुठल्याही प्रकाराचे पोलिसिंग होत नसून केवळ सकाळी एक फेरी मारली की पुन्हा पोलीस शहरात येत नसल्याचे तक्रार नगरसेवक व नागरिकांनी केली आहे.
शहरात नगर परिषदेने ठरवून दिलेला भाजीपाला किराणा दुकानदार व फळविक्रेते यांची वेळ संपली तरी शहरातील अनेक फळभाजीपाला विक्रेते शहरात अनेक ठिकाणी आपला माल विकत बसले बसतात. त्यामुळे शहरात गर्दी होत असल्याने करोनाचा धोका वाढला आहे.
– शहरातील सीमा बंद आहेत. या सीमा हे नगरसेवक आणि मुख्याधिकारी, नगरपालिका कर्मचारी हेच जातीने लक्ष ठेवून याबाबत दक्षता घेत आहे. केवळ विद्याधाम प्रशालासमोर दोन पोलीस उभे करून शहर सुरक्षित राहू शकत नाही. शहरात सहा ठिकाणी सहा पोलीस दिले तर शहरासाठी पुरे आहेत; परंतु ती व्यवस्था पोलीस अधिकाऱ्यांकडून केली जात नाही. याबाबत याबाबत आमदार अशोक पवार यांच्याकडेही तक्रार केली आहे.
– मुजफ्फर कुरेशी, सभापती, स्वच्छता आरोग्य समिती, शिरूर
शिरूर शहरात विविध ठिकाणी पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. पोलीस त्यांचे कर्तव्य चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक लॉकडाऊनच्या काळात फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. लॉकडाऊनच्या काळात सर्वतोपरी पोलीस काम करीत असून नागरिकही पोलिसांना सहकार्य करीत आहेत.
– प्रवीण खानापुरे, पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस ठाणे