जालना – देशात आलेली करोनाची दुसरी लाट आता ओसरते आहे. अनेक राज्यांत परिस्थिती सामान्य होत असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता परिस्थिती नियंत्रणात असली, तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या तिसऱ्या लाटेत जवळपास 60 लाख व्यक्ती बाधित होउ शकतात, असा अंदाज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.
जालना येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजेश टोपे म्हणाले, राज्यातील करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरला असला, तरी तिसऱ्या लाटेची लक्षण दिसायला सुरुवात झाली आहे. राज्यात काही दिवसांत रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. हे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत नसले, तरी तिसऱ्या लाटेची शक्यता फेटाळून लावता येऊ शकत नाही.
पहिल्या लाटेत 20 लाख नागरिक बाधित झाले होते. दुसऱ्या लाटेत 40 लाख नागरिकांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे तिसऱ्या लाटेत साधारण 60 लाख नागरिकांना करोनाची बाधा होण्याची शक्यता आहे, असा अंदाज टोपे यांनी व्यक्त केला आहे.
करोनाची तिसरी लाट आल्यास राज्याला सुमारे 4 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज निर्माण होऊ शकते. दुसऱ्या लाटेत एकूण 1700 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागली होती. मात्र तिसऱ्या लाटेत जर बाधितांची संख्या जर 60 लाखांवर गेली, तर निश्चितपणे 4 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.