धुळे – राज्यभरात सध्या सर्वत्र पोलीस भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हयात पोलीस भरतीसाठी तरुण-तरुणींमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. विशेष म्हणजे, यंदापासून राज्यात प्रथमच तृतीयपंथीयांना पोलीस भरती प्रक्रियेत सामावून घेतले आहे. यात धुळयातील तृतीयपंथीय चांद तडवीची शुक्रवारी सकाळी येथील पोलीस कवायत मैदानात शारीरिक आणि मैदानी चाचणी घेण्यात आली.
राज्य शासनाने पोलीस भरतीत तृतीयपंथीयांसाठी आरक्षण जाहीर केल्याने चांद तडवी उर्फ बेबो जोगी (27, सोयगाव, औरंगाबाद) हिने येथे पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल केला होता. फेब्रुवारीत भरती प्रक्रियेवेळी कागदपत्र पडताळणीसह तिला पुढील फेरीसाठी पात्र ठरविण्यात आले होते. परंतु, राज्य शासनाकडून तृतीय पंथियांसाठी शारीरिक मोजमापाचे तसेच मैदानी चाचणीचे निकष कोणते असावेत, याबाबत कुठलेही धोरण ठरले नव्हते. यामुळे चांदला राज्य शासनाचे धोरण जाहीर झाल्यानंतर बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
राज्य शासनाकडून तृतीयपंथीयांसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर झाल्यानंतर चांदला शुक्रवारी सकाळी पुढील प्रक्रियेसाठी धुळे येथे बोलविण्यात आले होते. चांदने निकषानुसार सर्व प्रक्रिया पार पाडली. शारीरिक तसेच मैदानी चाचणीही झाली. पोलीस कवायत मैदानावर तिच्या एकटीच्या चाचणीसाठी पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक संभाजी पाटील, निरीक्षक पावरा यांच्यासह महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तिला सर्व अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी धीर दिला. आता तिला लेखी परीक्षेसाठी बोलविण्यात येणार असल्याने चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
राज्यभरातून 73 अर्ज
पोलीस भरतीसाठी राज्यभरातून 73 तृतीयपंथीयांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. यानुसार साता-यातही तृतीयपंथीयांची आज मैदानी चाचणी पार पडली. या चाचणीत आर्या पुजारी, भूषण शिंदे आणि सतीश पाटील या तीन तृतीयपंथीयांची मैदानी चाचणी घेण्यात आली. साता-याच्या आर्या पुजारीने पोलीस भरतीमध्ये तृतीयपंथीयांसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी न्यायालयीन लढा दिला होता. आता त्याला यश मिळाले आहे.