कोल्हापूर – “महाविकास आघाडी सरकारने पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्तांची फसवणूक केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फसवलं आहे. यामुळे या सरकारशी संबंध ठेवायचा की नाही याचा विचार करावा लागेल. राजकारण हा आमचा काही धंदा नाही. आता मी कुणाच्याही दारात भेटायला जाणार नाही’असा निर्वाणीचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जयसिंगपूर येथे 20 वी ऊस परिषद झाली. या सभेत ऊसाला 3300 रुपये दर मिळावा असा ठराव करण्यात आला. ऊस परिषद सभेत बोलताना माजी खासदार शेट्टी यांनी एफआरपीचे तुकडे करण्याच्या विषयावरुन केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकावर जोरदार हल्लाबोल केला.
एफआरपीचे तुकडे करण्यात केंद्राचाही हात आहे असा हल्लाबोल शेट्टी यांनी केला. “पावसात भिजत भिजत सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. शेतकऱ्यांनी मोठया अपेक्षने सरकार बदलले.
महाविकास आघाडी सरकार बनविण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खारीचा वाटा आहे. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करताना आघाडीचा घटक म्हणून मी सूचक होतो. पण एफआरपीचे तुकडे करण्याची शिफारस केंद्राकडे पाठविताना मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला आहे.
महाविकास आघाडी सरकारने सगळयाच घटकांची घोर फसवणूक केली आहे. यामुळे यंदाच्या दिवाळीत मंत्र्यांचे काळे झेंडे दाखवून स्वागत करा. शिवाय मंत्र्यांची दिवाळी गोड होऊ देणार नाही.’ असे ते म्हणाले.