मुंबई – भारतीय चित्रपटसृष्टीला अभिनयाची वाट दाखवणारे “नटसम्राट’ पद्मविभूषण, दिलीपकुमार काळाच्या पडद्याआड गेले. ते 98 वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना (दि. 6) मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र लाखो चाहत्यांच्या प्रार्थना आणि डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न अपुरे पडले. आणि त्यांनी बुधवारी (दि. 7) सकाळी साडे सात वाजता अखेरच श्वास घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, दिलीप कुमार यांच्या अंत्यविधीचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्यांना आणि पापाराझींना अभिनेत्री क्रिती सनॉनने विनंती केली आहे. याविषयी तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली आहे.
‘अंत्यविधीसारख्या अत्यंत संवेदनशील घटनेच्या वेळी व्हिडीओ शूट करताना बॅकग्राऊंडमध्ये फोटोग्राफर्सच्या गप्पा ऐकायला मिळणं खूप त्रासदायक आहे’, असं तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं. बुधवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांकडून शेअर करण्यात आले. आणि याच मुद्द्यावरून क्रितीने आपले मत व्यक्त केले.
“एखाद्या व्यक्तीची अंत्यविधी माध्यमांनी आणि पापाराझींनी कव्हर करणे गरजेचे आहे का? अंत्यविधी हा अत्यंत खासगी असतो आणि माध्यमांनी कॅमेरा फ्लॅशिंग न करता लोकांना शांतपणे शोक व्यक्त करू द्यावा. अशा संवेदनशील घटनाप्रसंगीचे व्हिडीओ पाहताना बॅकग्राऊंडमध्ये फोटोग्राफर्सना गप्पा मारताना ऐकायला मिळणं खरंच खूप त्रासदायक आहे.
मी माध्यमांना आणि पापाराझींना विनंती करते की त्यांनी अंत्यविधीचं कव्हरेज करू नये. तुमची जवळची व्यक्ती हे जग सोडून गेल्यानंतर तुम्हाला असे कॅमेरा फ्लॅश झालेले आवडणार का? गोष्टी थोड्या बदलून पाहुयात.. कामाच्या आधी माणुसकीचा विचार करुयात”, अशी पोस्ट क्रितीने लिहिली.