वाल्हे – वाल्हे (ता. पुरंदर) परिसरामधील तीन विद्युत रोहित्रांची चोरी झाल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वीजे अभावी पीकांना पाणी देता येत नसल्याने पावसातून वाचलेले पीक हातून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पोलीस तसेच महावितरणकडूनही अशा चोऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी शासकीय कारभारामुळे मेटाकुटीस आला आहे.
वाल्हे उपविभागातील महावितरणच्या तीन ठिकाणचे विद्युत रोहिञ तोडून त्यातील तांबे चोरट्यांनी चोरून नेले आहे. वाल्हे (ता.पुरंदर) नजीक कामठवाडी येथील तीन रोहित्रांची चोरी झाली. रोहित्र गॅसकटरणे कट करून फोडली असून त्यातील हजारो रूपये किंमतीच्या तांब्याच्या तारा व ऑईलची चोरी करण्यात आली आहे. विद्युत रोहित्र चोरीला गेल्याने दोन दिवसांपासून अंधारात असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
या भागात पावसाने उघडीप दिल्याने पावसातून बचावलेल्या पिकांचे आता विद्युत पुरवठा नसल्याने पाण्याअभावी नुकसान होणार आहे. वाल्हे परिसरातील शेतकऱ्यांनी विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करण्याची मागणी महावितरणकडे केली असून रोहीत्र चोरीबाबत वाल्हे पोलिस दुरक्षेत्रामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.